मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अहमदपुरात मराठा समाजाचा जल्लोष
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे अहमदपूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
अहमदपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत बँड-बाजाच्या तालावर ठेका धरला. गुलालाची उधळण करत आणि फटाके फोडून या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
या आनंदोत्सवात राज्याचे सहकार मंत्री तथा मराठा आरक्षण समितीचे सदस्य नामदार बाबासाहेब पाटील स्वतः सहभागी झाले होते. त्यांनी मराठा समाजाला शुभेच्छा देत या लढ्याला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. गेल्या अडीच वर्षांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा लढा अखेर यशस्वी झाल्याची भावना यावेळी अनेक मराठा बांधवांनी व्यक्त केली. गरजवंत आणि गरीब मराठ्यांच्या हक्कांसाठी करण्यात आलेला हा संघर्ष महत्त्वाचा होता, असेही ते म्हणाले.
