वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा कधी होणार – स्वप्निल अण्णा जाधव

0
वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा कधी होणार - स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या वाढवणा येथे, गेल्या पंधरा-वीस वर्षापासून च्या मागणीनंतर शासनाने आता वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे. मात्र हे रुग्णालय प्रत्यक्षात लोकांसाठी कधी खुले होणार? हा प्रश्न आता परिसरातील जनतेला पडलेला आहे. वाढवणा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत च्या जवळपास 20-25 गावांना या ग्रामीण रुग्णालयाचा फायदा होणार आहे. या रुग्णालयासाठी अद्याप पूर्ण स्टाफ देखील भरती केलेला नाही. तसेच इमारत अद्यावत होऊनही तिचा लोकार्पण सोहळा झालेला नाही. जनतेसाठी जनतेच्या खिशातून टॅक्सच्या रूपाने काढलेला कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेली ही भव्य दिव्य इमारत सध्या फक्त शोभेची वास्तू बनली आहे. रुग्णालय ही अत्यावश्यक असून शासनाने तातडीने या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करावी, आणि हे रुग्णालय परिसरातील जनतेसाठी खुले करावे. अशी आग्रही मागणी युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी केली आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्निल अण्णा जाधव म्हणाले की, फक्त गुत्तेदार पोसण्यासाठी मोठमोठ्या इमारती उभा करून भागणार नाही, त्या इमारती ज्या कामासाठी आहेत, ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, किंवा उद्देश पूर्ण होत नाही. तोपर्यंत खर्ची पडलेला पैसा हा वाया जाणार आहे. कित्येक विकास कामे हे झाले की काही दिवसातच त्याचे बारा वाजत आहेत. अनेक शासकीय इमारती उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच पावसात गळू लागल्या आहेत. त्यामुळे अशा इमारती म्हणजे विकास म्हणता येणार नाही. तसेच जनतेच्या सोयीचा हेतू ठेवून उभारलेल्या इमारती ह्या जनतेसाठी खुल्या करणे गरजेचे आहे. वाढवणा येथे उभारलेले ग्रामीण रुग्णालय हे लोकांना खूप आशादायी वाटत होते, मात्र आता शासन त्या रुग्णालयामध्ये कर्मचारीच भरत नसेल तर त्या इमारतीचा काय फायदा? परिसरातील नागरिकांना छोट्या मोठ्या आजारानंतर देखील उदगीर किंवा लातूरला जावे लागत आहे. ही शोकांतिका आहे. धरण उशाला कोरड घशाला म्हणतात, तशा पद्धतीने टोलेजंग असा ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा उभारलेला असताना तो कुलूप बंद असल्यामुळे जनतेला त्याचा कवडी मात्र फायदा नाही, ही मोठी शोकांतिका आहे. केवळ दलाल आणि गुत्तेदार यांचे भले करण्यासाठी अशा इमारती उभारल्या गेल्या आहेत का? या रुग्णालयासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग का भरला गेला नाही ? याच्या अगोदर नियोजन करायला नको होते का? असा प्रश्नही स्वप्निल अण्णा जाधव यांनी उपस्थित केला आहे.
एकंदरीत वाढवणा परिसरातील जनतेच्या हिताचा विचार करून तातडीने हे रुग्णालय सुरू केले जावे, तसेच या रुग्णालयामध्ये स्टाफ भरती केला जावा. अशी मागणी ही त्यांनी शासनाकडे केली असल्याचे सांगितले आहे.
वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयामुळे परिसरातील अनेक गावातील रुग्णांना तातडीची मदत मिळणार आहे. आरोग्य ही अत्यावश्यक आणि मूलभूत गरज असल्याने ती भागवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. असे असताना देखील या रुग्णालयाबद्दल उदासीनता का? एक तर या रुग्णालयाला तब्बल 15 ते 20 वर्षाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मान्यता मिळाली, आता त्या रुग्णालयाची इमारतही उभा टाकली आहे. असे असताना केवळ शासनाच्या उदासीनतेमुळे ही भव्य दिव्य इमारत ओस पडली आहे. हे चित्र बदलले पाहिजे. तात्काळ ग्रामीण रुग्णालय चालू करून रुग्णसेवा द्यायला सुरुवात करावी. अन्यथा नाईलाजाने या परिसरातील जनतेला उठाव करावा लागेल. असा इशाराही स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिला आहे.

चौकट…….
आरोग्य सुविधेला प्राधान्य द्या – शिवा हाळे

आरोग्य विभागाच्या वतीने जनतेचे हित जोपासले जाते. जनतेच्या आरोग्याचा शिक्षणाचा विचार सरकारने करणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. या कर्तव्याचा भाग म्हणूनच शासनाने टोलेजंग इमारत उभा केली आहे. ग्रामीण रुग्णालयाला मान्यता देतानाच शासनाने सर्व नियोजन केलेले असते. असे असताना देखील वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत कोणाच्या सांगण्यावरून उद्घाटन प्रलंबित ठेवले जात आहे? नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या सोयी सुविधेसाठी रुग्णालय नसून जनतेसाठी आहे, याची जाणीव ठेवून तात्काळ ग्रामीण रुग्णालयाचे जनतेसाठी लोकार्पण करावे, अशी आग्रही मागणी वाढवणा येथील माजी सरपंच शिवा हाळे यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!