संकटाच्या काळात धावून जाणाऱ्या रोटरीचे कार्य अतुलनीय : ब्र. कु. महानंदा बहेनजी
उदगीर (एल पी उगीले) जगाच्या पाठीवर कुठेही संकट आले तर तिथे सर्वप्रथम धावून जात, मदतीचा हात पुढे करणाऱ्या रोटरी क्लबचे कार्य अतुलनीय असून सामाजिक शांततेच्या कामी रोटरीचा नेहमीच पुढाकार दिसून येत असल्याचे प्रतिपादन उदगीर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्र. कु. महानंदा बहेनजी यांनी केले. उदगीर
येथील रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा व जागतिक शांतता दिन सप्ताह कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन अन्नपूर्णा मुस्तादर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्नपूर्णा मुस्तादर यांनी केले. यावेळी ज्योतीप्रभा सोनटक्के, बालाजी रोडे, बालाजी सुगावे, आशा काळे, मेघा सुळे, प्रा.डॉ. दीपक चिद्दरवार, अनिता संकाये (टेंकाळे) यांचा राष्ट्राचे शिल्पकार पुरस्काराने सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना रामचंद्र तिरुके यांनी, पोलिओ निर्मूलन केवळ रोटरी क्लबमुळे साध्य झाले असल्याचे सांगत समाजातील चांगल्या गोष्टीची नोंद घेत जिथे गरज आहे याचा शोध घेऊन मदतीसाठी पुढे येण्यात रोटरी क्लब नेहमी अग्रेसर असल्याचे ते म्हणाले.
महानंदा बहेनजी यांनी आपल्या व्याख्यानात मनुष्याच्या जीवनाचा पाया शिक्षणातून घडत असल्याचे सांगत मनुष्याच्या शरीरापेक्षा मनाला शांती आवश्यक असून ही शांती प्राप्त होण्यासाठी मनुष्याने नेहमी सकारात्मक विचार बाळगून काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात अभियंता दिनानिमित्त रोटरी क्लबचे सदस्य असलेले अभियंता नरेश कदम, अभियंता सुनील कल्पे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. मंगला विश्वनाथे व विशाल जैन यांनी केले. आभार विक्रम हलकीकर यांनी मानले.
