“शिक्षणायन ” गुरुजनांचे आत्मचिंतन शैक्षणिक चर्चासत्र उत्साहात संपन्न.
उदगीर( प्रतिनिधी)
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था, उदगीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले “शिक्षणायन – व्रतस्थ गुरूजनांचे आत्मचिंतन” हे एकदिवसीय शैक्षणिक चर्चासत्र उत्साहपूर्ण वातावरणात श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेतील श्याम स्मृती सभागृहात संपन्न झाले. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा अभ्यास, नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, शिक्षकांची भूमिका आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या विषयांवर सखोल विचारमंथन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड सुपोषपाणि आर्य यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रमुख उपस्थिती सहसचिव अंजुमनीताई आर्य, शालेय समिती सदस्य देवेंद्र बिरादार, राजू गिरवलकर, प्राध्यापक सुरेश राजमाने,सेवानिवृत्त तज्ञ शिक्षक पांडुरंग पाटील, मोहनराव निडवंचे , विद्यार्थी प्रतिनिधी अंशुमन घाडगे, पाविरवी आर्य उपस्थित होते. तसेच श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेतील सर्व आस्थापना प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते , मान्यवर पालक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, संस्थाध्यक्ष ॲड सुपोषपाणि आर्य यांच्या स्व रचित स्वागत गीत स्वागत करितो आम्ही लेकरे या द्वारे सर्व अतिथी मान्यवरांचे, उपस्थितांचे गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शिक्षकांचे स्वागत करून चर्चासत्राच्या उद्दिष्टांविषयी मार्गदर्शन केले. संस्थेअंतर्गत कार्यरत विविध शाळांतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चासत्रामध्ये खालील विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षणतज्ञ ॲड सुपोषपाणि आर्य, राजू गिरवलकर , सुरेश राजमाने यांनी या शैक्षणिक चर्चा सत्रामध्ये खालील विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अनुभवी शिक्षकांनी सविस्तर मते मांडली. नवीन शैक्षणिक धोरण : संधी आणि आव्हाने,
बदलत्या काळातील शिक्षकांची भूमिका, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी उपयोग,
विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती,मूल्य शिक्षण आणि सर्वांगीण विकास,स्वयंअवलोकन व व्यावसायिक प्रगती,शाळा व्यवस्थापन व सामूहिक जबाबदारी या विषयावर चर्चा करण्यात आली.
विविध सत्रांमध्ये शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले अनुभव, समस्या आणि उपाय यांची देवाणघेवाण केली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अध्यापन अधिक परिणामकारक कसे करता येईल यावर विशेष चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सहभागी शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तावृद्धी साठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शिक्षण क्षेत्रातील नव्या घडामोडींची माहिती सातत्याने आत्मसात करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या समर्पित कार्याचे कौतुक केले व अशा प्रकारची चिंतनपर चर्चासत्रे नियमितपणे आयोजित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. उपस्थित सर्व शिक्षकांनी चर्चासत्रातून मिळालेले मार्गदर्शन आपल्या शैक्षणिक कार्यात प्रभावीपणे वापरण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी, अंतेश्वर बिरादार, वैशाली अणकल्ले,सुतार संगीता यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक भारत खंदारे यांनी व्यक्त केले .
एकूणच, “शिक्षणायन” हे चर्चासत्र शिक्षकांसाठी आत्मपरीक्षण, ज्ञानवृद्धी आणि व्यावसायिक विकासाची प्रेरणादायी पर्वणी ठरले. शिक्षणायन शैक्षणिक चर्चासत्र कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेतील सर्व आस्थापना प्रमुख भारत खंदारे, प्रवीण भोळे, आनंद चोबळे, विवेक उगिले यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
