सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा पुण्यात खून ? आरोपीला अटक करण्याची त्याची आर्त हाक
लातूर (ॲड. एल पी उगीले) लातूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णु शिंदे यांच्या मुलीचा सासरच्यनी खून केल्याचा आरोप
शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील मूळचा रहिवाशी असलेल्या आणि सध्या पुणे येथे राहत असलेला जावई आकाश बेडगे, सासू गीताबाई बेडगे व नणंद जयश्री साबळे, केदार पाटील, अजिंक्य देशपांडे, नितीन सोमवंशी, आशिष कावळे यांनी संगमताने आपल्या विवाहित मुलीला पैशासाठी छळ करून तीचा खून करून आत्महत्येचा बनाव रचला असल्याचा धडधडीत आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. आरोपीना दोन दिवसात कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालसमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा काशी लिंगेश्वर नगर, लातूर येथे 19 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दुःखाने हुंदका आवरता येत नसलेल्या अवस्थेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू शिंदे यांनी दिला आहे.
विष्णू शिंदे यांनी म्हटले आहे कीं, 10 जून 2014 रोजी माझी मुलगी अनुराधा हिचा विवाह रितिरिवाजा प्रमाणे औसा तालुक्यातील नागरसोगा येथील आकाश नामदेव बेडगे यांच्याशी लावून दिला होता. सर्व देणी करून हा विवाह पार पडला. सुरुवातीचे दोन वर्षे सुरुळीत आनंदित चालले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सध्या ते पसायदान सोसायटी, यमुनानगर निगडी येथे प्लॅट नं. 15 मध्ये राहत होते. ज्या ज्या वेळेस सासरच्यांनी पैसे मागितले त्या त्या वेळेस पैसे दिले. आतापर्यंत 50 लाख रुपये दिले आहेत. जावई जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. अचानक 1 सप्टेंबरला दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास विष्णू शिंदे यांना जावई आकाश बेडगे यांचा फोन आला की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. लागलीच शिंदे यांचे सर्व कुटुंबीय पुण्याला गेले. तिथे मुलीचा मृतदेह पाहून सर्वांनी एकच हंबरडा फोडला. मुलीच्या शरीरावर मारहानीचे व्रण दिसून आले. तिला आधी जिवे मारून नंतर साडीने गळफास देऊन सिलिंग फॅनला लटकावण्यात आलेले स्पष्ट दिसून येत होते असा आरोप विष्णु शिंदे यांनी केला आहे. त्यांनी पुढे असे स्पष्ट केले आहे की आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तीचा शारीरिक व मानसिक छळ करून तीचा खून करण्यात आला आहे. असा आरोप मुलीचे वडील विष्णू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. माझ्या मुलीचा छळ करून तीचा खून करणाऱ्या तिच्या पतीसह, सासू व नणंद इतर सहभागी आरोपीना गुन्हा दाखल होऊन 18 दिवस झाले तरी फरार आरोपीना अटक करण्यात आलेली नाही.
आरोपीना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मयत मुलीचे वडील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. अन्यथा दोन दिवसानंतर पुणे पोलीस अधीक्षक करायलासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करून आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
