भाजप नेते राजकुमार मजगे यांच्या समयसूचकतेमुळे वायगावचा मोठा अनर्थ टळला; तहसीलदार उज्वला पांगरकर यांचेही तात्काळ कार्य!
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे): शुक्रवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे वायगाव (ता. अहमदपूर) येथील पाझर तलाव तुडूंब भरला होता. शनिवारी सकाळी साधारणतः नऊ वाजता गावातील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली की, तलावाची पाळू (बंधारा) खचली आहे. यामुळे तलावातील पाण्याचा दाब वाढून मोठा अनर्थ घडण्याची भीती होती.
गावकऱ्यांनी तात्काळ भाजप नेते आणि वायगावचे माजी सरपंच राजकुमार मजगे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मजगे यांनी जराही वेळ न घालवता लगेच तहसीलदार उज्वला पांगरकर यांना फोनवर माहिती दिली.
तहसीलदार पांगरकर यांनीही घटनेचे स्वरूप ओळखून तात्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी संबंधित विभागाचे उपअभियंता पांचाळ यांना घटनास्थळी पाठवले आणि स्वतः पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांना सोबत घेऊन तातडीने वायगाव गाठले.
घटनास्थळी पोहोचल्यावर, प्रशासकीय टीमने तातडीने कार्यवाही सुरू केली. त्यांनी जेसीबी (JCB) च्या मदतीने तळ्याच्या दोन्ही बाजूने पाण्यासाठी तात्काळ मार्ग मोकळा करून दिला, ज्यामुळे तलावातील पाण्याचा दाब कमी झाला आणि धोका टळला. पांगरकर यांनी जवळपास अर्धा ते एक किलोमीटर पायी जाऊन काम पूर्ण होईपर्यंत एक तास घटनास्थळी थांबून कामावर लक्ष ठेवले.
राजकुमार मजगे यांच्या समयसूचकतेमुळे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी दाखवलेल्या तात्काळ कृतीमुळे व संवेदनशीलतेमुळे वायगाव गावावर आलेला मोठा अनर्थ टळला. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
धोका कायम
यावेळी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, तलाठी दत्तात्र्यय तेली ग्रामसेवक आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून सद्यस्थितीला धोका टाळला असला तरी, पुढील अतिवृष्टी झाल्यास वायगाव गावाला या पाझर तलावापासून धोका कायम असल्याचेही या घटनेने अधोरेखित केले आहे. या पाझर तलावाच्या कायमस्वरूपी दुरुस्ती आणि मजबुतीकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
