हेल्मेट न वापरल्याने दुर्दैवी मृत्यू; सुरक्षित वाहनचालकतेचा पुन्हा एक धडा.*
लातूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धानौरा पाटी–चाकूर मार्गावरील जढाळा गावाजवळ झालेल्या दुर्दैवी दुचाकी अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, प्राथमिक तपासात भरधाव व निष्काळजी वाहनचालकाने हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन किनगाव येथे गुन्हा क्रमांक 195/2026 अन्वये कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बालाजी सदाशिव जाधव (वय 46 वर्षे, रा. टाकळगाव का., ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ गणेश सदाशिव जाधव (वय 37 वर्षे, व्यवसाय – शेती) हा दि. 15 जून 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास एमएच 26 बीजी 1018 क्रमांकाची टीव्हीएस कंपनीची दुचाकी चालवत धानौरा पाटी–चाकूर मार्गावर जढाळा गावाजवळ जात असताना भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत असताना रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले की, अपघातावेळी मृत व्यक्तीने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेल्मेटचा वापर केला असता तर जीव नक्की वाचला असता.
या घटनेच्या अनुषंगाने हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक सुरक्षा कवच आहे, याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक नियमांचे पालन करणे आणि दर्जेदार आयएसआय मानांकित हेल्मेटचा वापर करणे ही प्रत्येक चालकाची जबाबदारी आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोनवणे हे करीत आहेत.
लातूर पोलीसांचे नागरिकांना आवाहन.
“वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतूक नियमांचे पालन करा आणि प्रत्येक प्रवासात हेल्मेटचा वापर करा. तुमची एक छोटी काळजी तुमचा अमूल्य जीव वाचवू शकते.”
