दयानंद कला महाविद्यालय बारावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष सुधाकर तेलंग व शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
लातूर (प्रतिनिधी) : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे खचलेल्या मानसिकतेला ऊर्जा मिळावी म्हणून इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या परिक्षार्थींचे दयानंद कला महाविद्यालयाने अनोख्या पद्धतीने स्वागत केले.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, प्रेरणा द्यावी, त्यांचे मनोबल उंचवावे यासाठी प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, जयमाला गायकवाड उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
फुग्यांनी सजलेल्या रंगीबेरंगी कमानी, सुंदर रांगोळ्यांची सजावट,राज्य मंडळाचे बोधचिन्ह सर्वांची मने आकर्षित करून घेत होते. मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन लातूर विभागीय राज्य मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राज्यमंडळ सदस्य डॉ. संदीपान जगदाळे, विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव मारुती फडके, सहायक शिक्षण संचालक दत्तात्रय मठपती, सहाय्यक अधिक्षक नितीन देशपांडे, शिवाजी कांबळे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव आदी उपस्थित होते.
दयानंद कला महाविद्यालयात ४४८ विद्यार्थो १२ वी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून परीक्षा मोठ्या उत्साहात व सुरळीत सुरू झाल्या आहेत. परीक्षार्थी स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.चांदेश्वर यादव, प्रा.जिगजी बुद्रुके, प्रा.विलास कोमटवाड, डॉ गोपाळ बाहेती, प्रा.महेश जंगपल्ले, बालकिशन अडसूळ यांनी परिश्रम घेतले.
