परिश्रम, जिद्द आणि चिकाटी हीच यशाची गुरूकिल्ली -प्राचार्या रेखाताई तरडे
पु.अहिल्यादेवी माध्य.व उच्च माध्य. विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा गौरव सोहळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : आज सगळीकडे गुणवत्तेला, ज्ञानाला महत्त्वाचे स्थान असून एकेक गुणांसाठी अतिशय स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल तर आपल्या मध्ये परिश्रम करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव तथा माजी जि प सदस्या प्राचार्या रेखाताई तरडे मॅडम यांनी केले. ते सांगवी सुनेगाव येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि.२८ रोजी आयोजित केलेल्या गुणगौरव समारंभात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिंडे भास्कर, श्री व सौ संपत्ते शिवकन्या मधुकर, लोहकरे संभाजीराव,श्री व सौ तांदळे शोभा रमाकांत, देशोन्नती चे पत्रकार शरद कासले, तेजस दिंडे, ॠतुजा संपत्ते, प्रवीण तांदळे, कौशल्या देवकते, संजय पाटील आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना रेखाताई तरडे म्हणाले की, या विद्यार्थ्यानी जे यश संपादन केले आहे ते त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या पालकांच्या कठोर तपश्चर्येमुळे. नीटच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात आता ही गुणवंत मुलं आपापल्या महाविद्यालयात नावलौकिक कमावतील यात शंका नाही. यावेळी एम .बी. बी. एस. ला प्रवेश मिळाल्यामुळे तेजस दिंडे आणि सुदर्शन लोहकरे यांचा तर बी.ए.एम.एस.ला प्रवेश मिळाल्यामुळे ॠतुजा संपत्ते आणि प्रवीण तांदळे यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तेजस दिंडे ,सुदर्शन लोहकरे आणि प्रवीण तांदळे यांनी विद्यार्थ्याना अभ्यासाबाबतीत सुंदर मार्गदर्शन केले. तर पालक प्रतिनिधी म्हणून कौशल्या देवकते यांनी उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले. तसेच पौष पौर्णिमा असल्याने आणि तिथीनुसार राजमाता जिजाऊ यांची जयंती असल्याने दैवशाला शिंदे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मुळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवशाला शिंदे यांनी केले तर आभार शेख जिलानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश चेपूरे, संभाजी दुर्गे, अच्यूत सुरनर,राजाराम बुर्ले, राजकुमार पनाळे, तुकाराम शिंगडे, अमोल सारोळे, प्रदीप रेड्डी, जनार्धन मासुळे, मिनल गोगडे, चिंतन गिरी, गजानन फुलारी, गणेश जाधव, हिदायत शेख, विश्वंभर सुरनर, विवेकानंद सुरनर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
