गरीबांच्या मुलांना मोठ करण्याचे कर्तव्य शिक्षकांचे : आ.संजय बनसोडे
२५ टक्के निधी जि.प. शाळांसाठी खर्च करणार
उदगीर (एल.पी.उगीले) : कष्टकरी, शेतक-यांच्या पाल्यासह गोरगरिबांची मुले गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. सध्याच्या डिजीटलच्या युगात जिल्हा परिषद शाळा ह्या मागे पडल्या तर काही ठिकाणची पटसंख्या कमी होत आहेत, ही विचार करण्याची बाब आहे. एखाद्या वेळेस गावात रस्ता, नाली नसली तरी चालेल. पण शिक्षणाचा दर्जा घसरु नये. यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या सर्वांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या गुरुवर्यांच्या चरणी सदैव नतमस्तक रहावे. गरिबांच्या लेकराच्या शिक्षणाची काळजी घेवुन गरीबांच्या लेकराला मोठ करण्याचे काम आपण सर्व शिक्षकांनी करावे. ते आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर येथे आयोजीत जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेत बोलत होते. ही शिक्षण परिषद जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड, जिल्हा परिषद लातूर व शिक्षण विभाग पंचायत समिती उदगीरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमास लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जि.प.माध्यमिक लातूरचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक विभागच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, मुरूड डायटचे प्राचार्य राजेंद्र गिरी, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटविकास अधिकारी महेश सुळे, गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे,डाॅ.भागिरथी गिरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळकोटचे सभापती अर्जुन आगलावे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, प्रा.श्याम डावळे, योगेश सुर्यवंशी, सतिश भापकर, गिरीश माने, विजयकुमार चवळे, मनोज गोंदेगावे, विजय सायगुंडे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी ,
ग्रामीण भागात शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे, हा दर्जा सुधारण्यासाठी सर्व शिक्षकांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. आपण भौतिक विकासाच्या पाठीमागे आहोत. यामुळे आपला शिक्षणाचा दर्जा कमी होत असल्याचे निर्देशनास येत असुन राज्य शासनाने जास्तीत जास्त खर्च हा शिक्षणावर केला पाहिजे. त्यामुळे सर्वमान्यांची मुले शिक्षण घेवुन मोठ – मोठया पदावर काम करतील, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षणाची चिंता व्यक्त करुन मतदार संघातील २४ शाळा ह्या जास्त गुणवत्ता असलेल्या आहेत, तर ५०-६० शाळा ह्या कमी गुणवत्तेच्या आहेत. मी मंत्री असताना शहराच्या भौतिक विकासाच्या पाठीमागे होतो मात्र आता माझ्या फंडातील २५ टक्के रक्कम शाळांसाठी खर्च करणार असुन यासाठी ग्रामीण भागातील पुढारी व शिक्षकांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी
आ.संजय बनसोडे यांनी केले.
यावेळी १५ आदर्श शिक्षकांचा गौरव शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
