आज देशाला आग विझवणाऱ्या हातांची गरज : डॉ.रफिक पारनेरकर

आज देशाला आग विझवणाऱ्या हातांची गरज : डॉ.रफिक पारनेरकर

उदगीर(एल.पी.उगीले) : शहरातील जनपरिवर्तन मित्र मंडळाच्या वतीने नगरपरिषद व्यापारी संकुलच्या प्रांगणात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रफिक पारनेरकर हे उपस्थित होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बौद्ध धर्म गुरु भदंत नागसेन तसेच मौलाना नूर उल ह्कसाहेब, जमाते इस्लामी हिंद उदगीरचे अध्यक्ष दायमी रहिमुद्दिन व पोलीस निरीक्षक गोरख दिवे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हाफ़ीज़ मेअ़राजूल हक़ यांच्या पवित्र कुरआन पठनाने करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व व सामाजिक सौहार्दाची आवश्यकता या विषयावर दायमी रहिमुद्दीन यांनी आपले विचार मांडले.
बौद्ध धर्म गुरु भदंत नागसेन यांनी समाजाला मानवतेसाठी महापुरुषांच्या विचारांची आवश्यकता आहे, आपण सर्व महामानवांच्या शिकवणुकीचा अभ्यास व सन्मान केला पाहिजे, असे आपले मनोगत व्यक्त केले.
मौलाना हमाद कुरैशी इमाम मस्जिद पैगंबरपुरा यांनी आपल्या मनोगतातून आज ज्याप्रमाणे वेगवेगळ्या महापुरुषांवर, ज्या पद्धतीने आपत्ती जनक टीका केली जात आहे, हे अत्यंत चुकीचे व शांत समाजासाठी विघातक कृती असून अशा लोकांना सर्व लोकांनी मिळून विरोध केला पाहिजे. जनमानसात महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व लक्षात आणून दिले पाहिजे, कारण जगातल्या कुठल्याही महापुरुषांनी चांगलीच शिकवण दिली असून, त्या सर्वांचा आदर व सन्मान करणे हे पैगंबर मुहम्मद (स) यांनी सांगितले आहे.

समाजात काही दुर्गुण व्यक्ती आग लावण्याचे काम करत आहेत. या सर्वांना आपण सर्व एकत्र येऊन थांबवले पाहिजे असे आवाहन या प्रसंगी केले.
पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी आग लावणाऱ्या पेक्षा आग विझवणारा हा कधीही श्रेष्ठ हा विचार सर्वांनी आपल्या जीवनात रुजवीला पाहिजे . शहरात शांती स्थापनेसाठी निर्माण करण्यासाठी पोलिसांना नेहमी सहकार्य करावे व कायद्याचे पालन करत राहावे, असे याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रफिक पारनेरकर यांनी आपल्या मधुर व रसाळ वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून पैगंबर मुहम्मद (स) यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या शिकवणीचा प्रभाव अरबस्थानातील अरबी समुदायावर कशाप्रकारे झाला. कुरआनाच्या माध्यमातून समस्त विश्वातील समाज परिवर्तन कसे झाले हे नमूद केले. काही वर्षापूर्वी वर्षापूर्वी भारतीय समाजातील लोक आपसात बंधू भावनेने व एकमेकांचा आदर व सन्मान करीत जीवन व्यतीत करीत असताना समाजात अचानकपणे आपल्या राजकीय स्वार्थीपोटी दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. व समाजात आग लावण्याचे प्रयत्न दिवसेंदिक वाढत गेले अशा आग लावणाऱ्यापासून वेळीच सावधान झाले पाहिजे, तसेच आग विझवणाऱ्यामध्ये आपले नाव आले पाहिजे. तरच समाजामध्ये शांती मानवता बंधुभाव निर्माण होईल, असे विचार व्यक्त केले. शाहू, फुले,आंबेडकर हे महाराष्ट्राचे गौरव आहेत. यांच्या विचारांचा वारसा आपल्याला समाजात रुजविला पाहिजे. संत तुकारामांनी तसेच महात्मा फुले यांनी इस्लाम विषयी आपले साहित्य कशाप्रकारे लिहिले व त्या मागची भूमिका काय होती. हे याप्रसंगी त्यांनी सविस्तरपणे सांगितले. पवित्र कुरआनचे पहिले मराठी भाषांतर करणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज हे होते. विविध महापुरुषांच्या कार्याचा वारसा आपण पुढे जपला पाहिजे समाजाला दिशा देण्याचे कार्य एकमेकांना समजून घेण्यामध्येच आहे व एकमेकांचा आदर करणे यातच आहे असे अनमोल मार्गदर्शन या प्रसंगी अध्यक्ष भाषणात त्यांनी नमूद केले. महापुरुषांच्या जयंती या नाचत गाजत साजरा करण्यापेक्षा डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले पाहिजे म्हणजेच त्यांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे. आज ज्याप्रकारे त्यांच्या जयंत्या साजरा होतात यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. जन परिवर्तन मित्र मंडळाने अशा प्रकारचा कार्यक्रम घेतल्याबद्दल मित्रमंडळाचे त्यांनी अभिनंदन केले व असेच कार्य मित्र मंडळ तर्फे व्हावे अशी अपेक्षा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोमीन मुजीब सर यांनी केले.आभारप्रदर्शन जनपरिवर्तन मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेख अझरोद्दीन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी शहरातील विविध मान्यवर व विविध जाती, धर्मातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!