विज जोडणीसाठी शेतकऱ्यांनाच मागतात लाच!!
लुचपत विभागाने आणली त्यांच्यावर आंच !!!
लातूर (एल. पी. उगीले) : जगाचा पोशिंदा बळीराजा आज विविध विभागाच्या भ्रष्ट आणि मस्तवाल अधिकाऱ्याकडून सतत लुबाडला जातो आहे. शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांसाठी विविध लोककल्याणकारी योजना जरी जाहीर केल्या असल्या तरी, प्रत्यक्ष त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी बळीराजाला छळले जात आहे. ज्या बळीराजाच्या आशीर्वादावर आपण जगतो. त्याच बळीराजाला लाच मागून आपला मस्तवालपणा दाखवणाऱ्या विद्युत महामंडळाच्या लाचखोर अभियंत्याला लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चतुर्भुज केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता माधवराव सुधाकरराव बिराजदार (वय 40 वर्ष, वर्ग 2) यांची नेमणूक महावितरण शाखा कार्यालय, हरंगुळ जि. लातूर येथे होती. या मस्तवाल अधिकाऱ्याने नागझरी गावठाण डी पी वरून तक्रारदार आणि त्याचे दोन शेत शेजारी यांचा शेती पंप चालू ठेवण्यासाठी आणि गावठाण डी पी चा शेती पंप साठी वीज पुरवठा चालू करण्यासाठी सर्वांचे मिळून एकत्रितपणे 25 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र सदरील लाचेची रक्कम पंचवीस हजारावरून दहा हजारावर पंचा समक्ष स्वीकारली. लाच स्वीकारल्यानंतर थोड्यावेळाने लाचलुचपत विभागाच्या पथकाने आरोपी लोकसेवक माधवराव सुधाकरराव बिराजदार यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पंडित रेजितवाड यांच्या सहकार्याने सापळा पथक पोलीस निरीक्षक प्रतिबंधक विभाग लातूरचे भास्कर पुल्ली आणि त्यांचे सहकारी यांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.
या यशस्वी सापळ्यानंतर पोलीस उपाधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर, पंडित रेजीतवाड यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, दलाल यांनी शासकीय कामे करून देण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
