विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा रस्त्याच्या मध्यभागी व्हावा
उदगीर (एल.पी.उगीले) : विश्वरत्न बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांदेड – बिदर रोडवरील पुर्णाकृती पुतळ्याचे पुनर्रचना करुन सदर पुतळा हा रोडच्या मध्यभागी घ्यावा. या मागणीचे निवेदन बौद्ध समाज बांधवांच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आले असुन गेल्या अनेक वर्षापासुनची ही समाजाची मागणी असुन नगर परिषदेच्या सभागृहात तसा ठराव झाला असल्याची माहिती न.प.चे माजी बांधकाम सभापती गजानन सताळकर यांनी दिली आहे.
मुख्य रस्त्यावर चौक विकसित करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा म्हणून समाजबांधव व डाॅ. आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने उदगीरचे उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
उदगीर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्रचना नांदेड बिदर रोडच्या मध्यभागी करून चौक विकसित करण्यात यावा, अशी मागणी समाज बांधव व डाॅ.आंबेडकर प्रेमी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र प्रशासन यावर काहीच उपाय योजना करत नाही, ही खंत असल्याची भावना समाजातून व्यक्त होत आहे. आता तरी आमच्या मागणीचा सकारात्मक विचार प्रशासनाने करावा. अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.
याबाबत उदगीर येथील समाजबांधव व डाॅ. आंबेडकर प्रेमी नागरिकांकडून येथील नगरपालिकेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार प्रशासनाच्या वतीने उदगीर शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम चालू आहे. रस्त्यावरील काही अतिक्रमणे हटविण्यात आलेली आहेत. या शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तर येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची पुनर्रचना व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. परंतु मुख्य रस्त्याच्या कडेला असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुख्य रस्त्याच्या मध्यमागी उभारून चौक विकसित करून सुशोभीकरण करण्यात यावे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रस्त्याच्या कडेला कोपऱ्यात असल्याने स्पष्टपणे निदर्शनास येत नाही. महामानव डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्याने उभारण्यात येणारा पूर्णाकृती पुतळा मुख्य रस्त्याच्या मध्यभागी दर्शनी भागात उभारण्यात यावा, अशी मागणी समाज बांधव व आंबेडकर प्रेमी जनतेची आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जाणारा रस्ता हा या चौकामध्ये बिदरकडे जाणारा रस्ता तसेच नांदेडकडील जाणारा रस्ता व रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता व लक्ष्मीनारायण मंदिर व तळवेस कडे जाणारे रस्ते जोडले जातात. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब यांच्या नावाने चौक असून, याच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा गेल्या अनेक वर्षापासून आहे. सदरील ठिकाण हे उदगीरकरांचे श्रध्दास्थान असून हा विषय भावनिक व सामाजिक आहे.तरी पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसवावा,अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.
या निवेदनावर माजी बांधकाम सभापती गजानन सताळकर, समीर शेख, गणेश गायकवाड, राजकिरण शिंदे, बापूसाहेब कांबळे, प्रीतम सूर्यवंशी, धनाजी बनसोडे, अण्णासाहेब बनशेळकीकर, नितीन एकुर्केकर, प्रा.बिभीषण मद्देवाड, सिध्दार्थ सुर्यवंशी, साधू लोणीकर, संजय वाघे, गौतम सोमवंशी, आकाश कस्तुरे, अरुण उजेडकर, प्रदीप कांबळे, मुसा पठाण, शिवमुर्ती उमरगेकर, माया कांबळे, सत्यवती गायकवाड, शिवाजी कांबळे, अनिल सोमवंशी, निवृत्ती भाटकुळे , वसंत पाटील मीनाक्षी कांबळे, वैशाली कांबळे, इंदुबाई सोनकांबळे, पंचशीला कांबळे, बेबीनंदा वडगावकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
