वार्षिक स्नेहसंमेलनामुळेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : शाळांचे वार्षिक स्नेहसंमेलन हे केवळ करमणुकीसाठी नसून विद्यार्थ्यांच्या अंगात असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणारे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेला कार्यक्रम आहे असे उद्गार माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी काढले. ते उदगीर येथील रामकृष्ण पब्लिक स्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री आ. संजयभाऊ बनसोडे हे उपस्थित होते. यावेळी आ. बनसोडे पुढे बोलताना असे म्हणाले की, अभ्यासाच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये जे कला गुण असतात, त्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. अशा या कार्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण दडलेली असतात, ते मार्गदर्शक असलेल्या शिक्षकाच्या निदर्शनास येण्यासाठी तथा भविष्यात त्या संदर्भात योग्य दिशा देण्यासाठी अशा कार्यक्रमातूनच ते स्पष्ट होते. स्नेहसंमेलनाच्या आयोजनातून त्या सुप्त गुणांचा विकास होत जातो, आणि अशा कार्यक्रमामुळेच येणाऱ्या काळात मोठ मोठे कलाकार सुद्धा निर्माण होऊ शकतात. असे माजी मंत्री आ.संजय भाऊ बनसोडे म्हणाले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकरावजी पाटील आतनूरकर, समीर भाई शेख, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
