वार्ड क्रमांक 2 मध्ये लाखो लिटर पाण्याची होतेय नासाडी

वार्ड क्रमांक 2 मध्ये लाखो लिटर पाण्याची होतेय नासाडी

लामजना ग्रामपंचायत करतेय जाणीवपुर्वक दुर्लक्ष

लामजना (कैलास साळुंके) : लामजना गावातील वार्ड क्रमांक 2 मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या तोट्या खराब होण्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे त्या वस्तीत ऐन कोरोनाच्या काळात घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून घाणीच्या साम्राज्यात डुकरांचा वावर वाढल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे तेथील सर्वसामान्य नागरिकांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
या बाबत लामजना ग्रामपंचायत कडून कसलीही उपाययोजना केली जात नसून त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने संबंधित टाकीची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांतून केली जात आहे.

लामजना गावातील काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी असताना वार्ड क्रमांक 2 च्या सुतार यांच्या घराजवळच्या टाकीच्या तोट्या दुरुस्ती बाबत ग्राम पंचायत कडून कसलीही उपाययोजना केली जात नसून या बाबतीत विचारपूस केली असता ग्रामपंचायत कडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

वार्ड क्रमांक 2 मधील टाक्याच्या तोट्या खराब होण्याने, तोट्याची दुरुस्ती न केल्याने पाण्याचा दररोज अपयव्य सुरू आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा फवारा सुमारे 10 ते 15 फूट उंच उडत असतो ,तेच पाणी नाल्यात कोंडून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून पाण्याच्या टाकीजवळ मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे.

या सर्व प्रकारांमध्ये सर्वसामान्यांकडून तक्रारी देऊनही ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असून नागरिकांच्या तक्रारी ऐकूनही ग्रामपंचायत गप्प बसून राहण्याची भूमिका बजावत आहे.

गावात पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायत कडुन विविध प्रकारच्या उपाययोजना करत असल्याचा दावा केला जातो. दुष्काळाची तीव्रता निर्माण झाल्यावर प्रत्येक नळाला तोट्या बसवण्याची मोहीम ग्रामपंचायत कडुब राबविण्यात येते मात्र वार्ड क्रमांक 2 मधील या टाकीला तुटी बसवण्याला मुहूर्त कधी सापडणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

लामजना गावातील वार्ड क्रमांक 2 मधील सुतार यांच्या घराजवळच्या टाकीच्या तोट्या गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाल्या असून त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून, त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले त्यामुळे ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्ती करावी. (रमेश जावळे – नागरिक लामजना)

About The Author

error: Content is protected !!