ग्राहक जनजागृती व्यापक प्रमाणात हवी – अभिजीत औटे

उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक युगाचा आधार घेऊन सर्वसामान्य ग्राहकांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे सर्व टाळण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात देखील ग्राहकांच्या जनजागृतीसाठी, तसेच सायबर गुन्ह्याला आळा घालण्यासाठी व्यापक स्वरूपात शासकीय पातळीवरून काम होणे गरजेचे आहे. असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा विविध सामाजिक संघटनातून जनतेची सेवा करणारे अभिजीत अशोकराव औटे हे ग्राहक चळवळ आणि औटे मित्र मंडळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक दिन निमित्तच्या कार्यक्रमात बोलत होते. ग्राहक जनजागृती दिन हा केवळ शासकीय कार्यालयात साजरा करून भागणार नाही, तर त्यासाठी ग्राहकांची विधी साक्षरता निर्माण करणे गरजेचे आहे. 1986 पेक्षा 2019 चा ग्राहक संरक्षण कायदा ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही फायद्याचा आहे. या आधारावर शासकीय पातळीवर होणारे बदल आणि कायद्याबद्दलची ग्राहकांना जागृती करणारे आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात ठग सामान्य माणसांना फसवतात,अनेक वस्तू बोगस,बनावट बाजारात आणल्या जातात,त्यावर नियंत्रण ठेऊन ग्राहकांची फसगत टाळावी. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन ग्राहकांनी देखील सावध असले पाहिजे. मात्र कधी कधी विषय हा सामान्य माणसांच्या कक्षेच्या पलीकडे असल्यास तो फसू शकतो. हे टाळण्यासाठी विधी साक्षरता काळाची गरज आहे. शासकीय पातळीवर कायद्याची जनजागृती तर होतेच त्यासोबतच ग्राहक संरक्षण परिषदेच्या कमिटीवर अशासकीय सदस्यांची ही नियुक्ती केली जाते. मात्र ते सदस्य किती सजगपणे सामाजिक जाणीव जपत सक्रिय होऊन काम करतात? यालाही खूप महत्त्व आहे. असेही अभिजीत औटे यांनी सांगितले. जागतिक ग्राहक हक्क पंधरवडा जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक गावात आणि शहरांमधील प्रत्येक वार्डात ग्राहक जागृतीचे कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचेही ठाम मत अभिजीत औटे यांनी स्पष्ट केले. या लोककल्याणकारी मोहिमेसाठी समाजातून देखील स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन अशा पद्धतीच्या जनजागृतीसाठी सहकार्य करू शकतील. ज्यामुळे नागरिकांचे मूलभूत हक्क कायम राहतील, सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात उपभोक्ता हा ग्राहकाच्या रूपाने पुढे येत असल्यामुळे ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्य या संदर्भातही त्याला सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासनाने आपल्या पातळीवर कार्यवाही करावी. अशी विनंतीही या कार्यक्रमात बोलताना अभिजीत अशोकराव औटे यांनी केली.