अंकुश वाडीकर यांची शालेय सुधारणा समितीच्या अध्यक्षपदाची यशस्वी वाटचाल
उदगीर (एल.पी.उगीले) शाळेचा भौतिक व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी गावातील नागरिकांचा, पालकांचा व शिक्षकांचा सहभाग असावा या उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने प्रत्येक शाळेसाठी शालेय सुधारणा समितीची स्थापना केली जात असते. खऱ्या अर्थाने शालेय सुधारणा समितीचे काम शाळेच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. याच अनुषंगाने सीमावर्ती भागातील कमालनगर तालुक्यातील चवरदापका येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या शालेय सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी अंकुशराव वाडीकर यांची निवड झाली आणि गेल्या तीन वर्षापासून त्यांनी हे पद यशस्वीरित्या पार पाडत आहेत. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाची धुरा जबाबदारी, आत्मीयतेने सांभाळली. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. अनेक सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले. राष्ट्रमाता जिजाऊ जयंती,शिवजयंती, शिक्षक दिन ,बालक दिन, महिला दिन, जागतिक पर्यावरण दिन अशा प्रत्येक कार्यक्रमाचे अतिशय नियोजनबद्ध आयोजन केले. प्रजासत्ताक दिन ,स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय सण- उत्सव देखील मोठ्या उत्साहांमध्ये साजरे केले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक ,मानसिक व भावनिक विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले. सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील वेगवेगळ्या मान्यवरांचे व्याख्यान ठेवून विद्यार्थ्यांना विचारांची मेजवानी दिली . या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संस्कार रुजविण्याचा प्रयत्न केला. शाळेतील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. एवढेच नाही तर स्वखर्चाने अनेक जबाबदाऱ्या उचलल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या बक्षिसांचे वाटप केले. शाळेच्या सुधारणेसाठी तन-मन धन लावून धडपडणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व विविध क्षेत्रांमध्ये प्रविण यश संपादन केले, कृषी विभागातील तालुका, जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी अवार्ड, कृषीरत्न, समाजरत्न अनेक क्षेत्रात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व,शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लाभणे ही शाळेच्या दृष्टीने भाग्याची बाब आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आपल्या परिसरातील ज्या ज्या व्यक्तींनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव काम केलेला आहे अशा व्यक्तींचे सन्मान ठेवून शाळेचाही मान वाढवला आणि एक चांगली परंपरा घालून दिली. मोठ्या मनाने इतरांचे कौतुक करण्याचा त्यांचा स्वभाव हा सर्वांना आकर्षित करत असतो. आपल्या गावासाठी ,समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या विचाराच्या अनुषंगाने नेहमी प्रयत्नशील असतात.
