‘उच्चतम अनुभूतीचा आविष्कार हे साहित्यिकासाठी आव्हान – धनंजय गुडसूरकर

0
'उच्चतम अनुभूतीचा आविष्कार हे साहित्यिकासाठी आव्हान - धनंजय गुडसूरकर

उदगीर (एल पी उगिले)
‘उच्चतम अनुभूतीचा आविष्कार लेखनातून प्रकट होणे हे साहित्यिका साठी आव्हान असते, लिहित्याहातांना याची जाणीव कायम असली पाहिजे, त्याच जाणिवेतून मी लेखन करीत असतो’ या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक धनंजय गुडसूरकर यांनी आपली लेखना मागची भूमिका मांडली. अक्षरमुद्रा आयोजित’ साहित्य संवाद ‘या उपक्रमातील पाचवे पुष्प त्यांनी ‘मी का लिहितो?’ या विषयावर मांडले. अध्यक्षस्थानी सहयोग बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने होते.
संयोजक प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार यांनी प्रास्ताविक केले.बालाजी बुन्नावार, शिवलिंग मठपती यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कलावंत हा मानवी जीवनाचा शिल्पकार असतो,लेखक त्याला अपवाद असण्याचे कारण नाही, आत्म्याचा अभियंता असलेल्या लेखकाला भवताल टिपता आला पाहिजे,सुक्ष्म निरीक्षणातून व व्यापक दृष्टी ठेवून पाहिले तर मिळणारा अनुभव लेखकाला दृष्टी देऊन जातो,असे प्रतिपादन गुडसूरकर यांनी पुढे बोलताना केले.
‘माणसे व भवताल वाचायला आले की मग लेखनाला आतून सुरुवात होते,लेखन ही ठरवून होणारी बाब नसली तरी त्यासाठी वाचनाची बैठक लागते. असे मत व्यक्त करुन गुडसूरकर यांनी लेखनाच्या अंगाने येणारे अनुभव कथन केले. लेखनाला मिळणारे सन्मान ही अनुषंगिक बाब असताना सन्मान हेच प्रयोजन ठेवून होणारे लेखन ही चिंतेची बाब असल्याचे गुडसूरकर म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात सहयोग बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने यांनी उदगीरच्या सांस्कृतिक संचिताचा आढावा घेत साहित्यिक, कलावंत हे समाजाचे भूषण असल्याचे सांगितले. साहित्याच्या अंगाने होणा-या बाबी या सामाजिक सुचिन्ह असल्याचे ते म्हणाले. प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार यांनी सूत्रसंचालन तर डॉ.गौरव जेवळीकर यांनी आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!