शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाने घ्यावी – विवेक पंडितराव जाधव
उदगीर (एल पी उगिले) तालुक्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. सर्व शेतकऱ्यांना आता ई-पीक पाहणी, पिकविमा भरणे, पिकाचे नुकसान झाल्यास त्याची ऑनलाईन तक्रार करणे आदी गोष्टी कराव्या लागणार आहेत.
ही सर्व प्रक्रिया स्वतः करू शकणारे शेतकरी अगदी मोजके आहेत, ऑनलाईन करण्यासाठी प्रत्येकाकडे तेवढे ज्ञान व त्याची माहिती नसल्या कारणाने शेतकरी शासकीय योजने पासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आपल्या स्तरावर महसूल व कृषी विभागामार्फत समिती गठीत करून प्रत्येक शेतकऱ्यांना विनामूल्य मदत करण्याची सर्वस्वी जबाबदारी घ्यावी. असे विचार उदगीर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक पंडितराव जाधव यांनी मांडले आहेत.
लवकरच उदगीरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची सोय कशी करता येईल ? याबाबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन प्रक्रियेची विनामूल्य सोय झाल्यास शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचे होणार आहे.
