उड्डाण पुलावरील खड्डे तसेच महापुरुषांच्या चौकातील खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन – बालाजी सोनाळे
उदगीर (एल पी उगिले)
उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शाहू महाराज चौक तसेच कॅप्टन कृष्णकांत चौक यासह शहरातील विविध भागांमधील रस्त्यांची चाळण झाली आहे. उड्डाण पुलावर मोठा खड्डा पडल्यामुळे दैनंदिन अपघात घडत आहेत. इतकेच नाही तर याच रस्त्यावर काही दिवसापूर्वीच ट्रॅव्हल्स खाली येऊन एक व्यक्ती मरण पावला आहे. रस्त्यावरील खड्डे यामुळे अगोदरच दुचाकी, चार चाकी वाहनांना कसरत करत जावे लागत आहे. त्यात पुन्हा शहरांमध्येच ट्रॅव्हल्स पार्किंग पॉईंट असल्यामुळे रहदारीला मोठी अडचण होत आहे. या सर्व बाबींचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अभ्यास करून संबंधितांना या अनुषंगाने निवेदन दिलेले आहे. रस्त्याचे खड्डे बुजवा, रहदारी सुरळीत करा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा शिवसेनेचे शहराध्यक्ष बालाजी सोनाळे यांनी दिला आहे.
रहदारी सुरळीत करावी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवावेत यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उदगीर यांना निवेदन देण्यात आले आहे. यासोबतच या निवेदनाची प्रत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी म्हणून विशेष लक्ष देणारे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, शहराध्यक्ष बालाजी सोनाळे, तालुका समन्वयक व्यंकट साबणे, शिक्षक सेना अध्यक्ष सचिन साबणे, अरुण बिरादार, दत्ता जाधव, रवी पाटील, तालुकाप्रमुख प्रशांत मोरे, उप तालुका प्रमुख महेश फुले, जिल्हा समन्वयक प्रकाश भाऊ हैबतपुरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
