स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही – दर्यापूरकर
उदगीर (प्रतिनिधी)
सध्या लातूर जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तविक पाहता वीज कायदा 2003 च्या कलम 55 प्रमाणे स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही. असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ प्रदेशाचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत. ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नका, असे स्पष्ट सांगावे. त्यांनी जर हे अमान्य केले तर त्यांना हाकलून लावावे. कारण नूडल एजन्सीला हाकलून लावने सरकारी कामात अडथळा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू होऊ शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्या लोकांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या आदेशाची, परिपत्रकाची प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊ शकत नाहीत. असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण या मीटरच्या वेगवान फिरल्याने विज बिल भरता भरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही. याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे. एका खाजगी कंपनीने कंत्राट घेऊन शासनाच्या काही लोकांना हाताशी धरून हे काम चालू केले आहे. भविष्यात हे मीटर रिचार्ज सिस्टीम चे होणार आहेत. त्यामुळे राज्यात त्याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसवण्याचे काम वीज वितरण कंपनी करत असेल तर त्यांना ताबडतोब विरोध करावा. जीनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसवले आहे, त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहेत. याकडे महाराष्ट्र विज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे.
