हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्र प्रेमाचे बीज पेरले जाते – डॉ. शरदकुमार तेलगाणे
उदगीर (एल. पी.उगीले) देशाला गतिमान करणारे कर्तबगार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारतीयांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल प्रेम निर्माण झाले पाहिजे, आपल्या तिरंग्याबद्दल स्वाभिमान निर्माण झाला पाहिजे. या उदात्त हेतूने हर घर तिरंगा हे अभियान राबवायला सुरुवात केली आहे.
पूर्वी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन अशा दोनच दिवशी राष्ट्रध्वज फडकवून कार्यक्रम घेतले जात होते. मात्र नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेम यांची बीजे पेरण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याचा सल्ला दिला, आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन हे अभियान महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवायला सुरुवात केली आहे.
या अभियानामुळे स्वातंत्र्याचे मूल्य आणि राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान जागृत व्हायला लागतो. असे विचार उदगीर येथील ओम हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम चे प्रमुख संचालक तथा राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे प्रदेश संघटक महामंत्री व समाज प्रबोधनात्मक कीर्तन करणारे कीर्तनकार ह.भ.प.डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील स्काय लाईन इंग्लिश स्कूल येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत तीन दिवस शाळेवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात येत असल्याने, पहिल्या दिवशीच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. शरदकुमार तेलगाने म्हणाले की, भारत देशाला कणखर नेतृत्व मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक स्वाभिमानी आणि देशाला पुढे घेऊन जाणारे संकल्पवान नेतृत्व लाभल्यामुळे लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. भारत देश हा महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी देशहीत डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय एकात्मता बाळगावी, तसेच राष्ट्रप्रेमाबद्दल जनजागृती करावी, लोककल्याणकारी योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवाव्यात. असेही विचार डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी व्यक्त केले.
