उदगीर विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे हा:हा:कार,शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – स्वप्निल जाधव

0
उदगीर विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे हा:हा:कार,शेतकऱ्यांना तातडीने मदत करा - स्वप्निल जाधव

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक खेडेगावातून अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. शेतीला चक्क नदीचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी पिकासह शेतातील मातीही वाहून गेली आहे. काही ठिकाणी तर चक्क मुरूम लागेपर्यंत माती निघून गेली आहे. हे शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान असून ते कधीही भरून येणार नाही, इतके मोठे आहे. शासकीय पातळीवरून दौरे आणि पाहणी, पंचनामे अशी नाटके करून शेतकऱ्यांचा वेळ वाया घालू नये. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी युवा नेते स्वप्निल अण्णा जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
या अनुषंगाने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना, स्वप्नील अण्णा जाधव म्हणाले की, निसर्ग कोपला आहे.सतत शेतकऱ्याच्या नशिबी संकटे पाचवीला पुजली आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमाल विकल्यानंतर, दलालांच्या ताब्यात माल आला की, त्याचा भाव वाढतो. मात्र शेतकऱ्याला कवडीमोल किमतीमध्येच आपला माल विकावा लागतो. हे दुष्टचक्र चालू असतानाच निसर्गाने देखील जणू बळीराजालाच नागवायचे ठरवून अतिवृष्टीचा तडाखा दिला आहे. मराठवाड्यातील शेतकरी दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच आडत बाजारातील मनमानी आणि सरकारची असलेली असंवेदनशीलतेची भूमिका, विमा कंपन्यांची लूटमार, दलालांचे राज्य, शेतमालाला हमीभाव नाही, अशा दुष्टचक्रात अडकलेला आहे. त्यात निसर्गाने खेळ मांडून, अस्मानी संकट निर्माण केले आहेत. त्यात राज्य सरकारने यावर्षीच्या साकार केलेल्या बजेटमध्ये शेतीसाठी केवळ 9710 कोटींची तरतूद केली आहे. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. आपल्यापेक्षा लहान असलेले राज्य कर्नाटक, त्या राज्याने शेतीसाठी 51 हजार 339 कोटी रुपये शेतीसाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे. कर्नाटक राज्यामध्ये घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना केंद्रस्थानी समजून घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्र शासनाने मात्र केवळ घोषणाबाजी आणि शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखवून मते मिळवले आहेत. त्यात कर्जमाफी असेल पिक विमा तात्काळ देण्याची गोष्ट असेल, सिंचनाची गोष्ट असेल, हमीभावाची गोष्ट असेल या सर्व बाबी सत्तेवर येताच सरकार विसरून गेले आहे. हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे खरे धोरण प्रत्यक्ष राबवण्यामध्ये हे सरकार सपसेल अपयशी ठरले आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली कामे, त्यामुळे चक्क रस्तेच वाहून गेले आहेत, कित्येक ठिकाणी पुल वाहून गेली आहेत. उद्योगपती व गुत्तेदार पोसण्याचे काम दलाला मार्फत करणाऱ्या सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या सारखी भूमिका घ्यावी का? असे आता वाटू लागले आहे. असाही प्रश्न स्वप्नील अण्णा जाधव यांनी उपस्थित केला आहे.
निसर्गाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे, किमान शासनाने तरी आपली जबाबदारी ओळखून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी. अशी विनंती महसूल प्रशासनामार्फत शासनाकडे स्वप्निल अण्णा जाधव युवा मित्र मंडळ यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!