मन्याड नदीला पूर; अनेक गावांचा अहमदपूर तालुक्याशी संपर्क तुटलानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मन्याड नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे सुनेगाव (शेंद्री) आणि शेनकुड येथील पूल पाण्याखाली गेले आहेत, परिणामी अनेक गावांचा अहमदपूर तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
सुनेगाव (शेंद्री), सुमठाणा, बेंबडेवाडी, वंजारवाडी, टाकळगाव यांसह परिसरातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. या गावांमध्ये येण्या-जाण्यासाठी मुख्य मार्ग असलेले पूल पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नदीची पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावातील नागरिकांनी आपली जनावरे, लहान मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांना नदीकाठापासून दूर ठेवावे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. जर पाण्याची पातळी आणखी वाढली, तर कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
