सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी घेतली ‘आपल्या माणसांसोबत’ चहाची बैठक; म्हणाले, ‘मी आजही मतदारसंघातली नाळ तुटू देणार नाही’
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील वायगाव पाटी येथील एका साध्या चहाच्या टपरीवर बसून सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. मंत्रिपद मिळाल्यानंतरही आपल्या जुन्या सवयी आणि लोकांशी असलेले नाते कायम असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
बुधवारी अचानक मंत्री पाटील वायगाव पाटी येथील एका हॉटेलवर थांबले. तिथे उपस्थित असलेल्या सर्वसामान्य माणसांमध्ये बसून त्यांनी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि चहा घेतला. राजकारणातील व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी आपल्या भागातील लोकांसाठी वेळ काढला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी जरी आज सहकार मंत्री असलो, तरी माझ्या मतदारसंघाशी असलेली नाळ मी कधीच तुटू देणार नाही. मी जिथून घडलो त्या सोबत्यांच्या माणसांचा आपुलकीचा चहा मी नाकारू शकत नाही.”
यापूर्वीही येता-जाता याच हॉटेलवर थांबून चहा घेण्याची त्यांची जुनी सवय आहे आणि आजही ती सवय कायम असल्याचे त्यांनी सांगितले. एका मोठ्या राजकीय पदावर असूनही सामान्य लोकांमध्ये सहज मिसळण्याच्या त्यांच्या या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे. त्यांच्या या साध्या कृतीने जनतेमध्ये एक चांगला संदेश गेला असून, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील अंतर कमी होत असल्याचे दिसून आले.
