सामाजिक शास्त्राच्या अभ्यासातून आदर्श नागरिक घडतो – डॉ. किरण गुट्टे
अहमदपूर, ( गोविंद काळे)
सामाजिक शास्त्रांचे अद्यावत ज्ञान संपादन करून संस्कारक्षम पिढी घडणे आवश्यक आहे. सामाजिक शास्त्रे नैतिक शिक्षण देतात त्यातूनच आदर्श नागरिक घडतो, असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर च्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ.किरण गुट्टे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्रे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभ्यास मंडळ उद्घाटन व भितीपत्रक प्रकाशन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक , लेखक तथा विचारवंत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर किसानपीठावर डॉ.किरण गुट्टे, उपप्राचार्य प्रो. डॉ.दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अर्थशास्त्र विभागाच्या ‘अर्थस्पंदन’, राज्यशास्त्र विभागाच्या ‘सार्वभौमत्व ‘ , समाजशास्त्र विभागाच्या ‘संस्कार’ , इतिहास विभागाच्या ‘संस्कृती ‘ , क्रीडा विभागाच्या ‘ध्यानचंद ‘ , भूगोल विभागाच्या ‘वसुंधरा’ व तत्वज्ञान विभागाच्या ‘तत्त्वप्रकाश ‘ या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. गुट्टे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले जीवन घडविण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळते परंतु त्यात यश संपादन करण्यासाठी सामाजिक शास्त्राचा नियमित व नियोजन पूर्ण अभ्यास करणे आवश्यक असतो. मिळालेली संधी विद्यार्थ्यांना ओळखता आली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करून आपले व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करता आले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सामाजिक शास्त्रे सामाजिक जाणीव निर्माण करतात. सामाजिक समस्येचे उकल करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आणि त्यातूनच बौद्धिक विकास होतो, असेही ते म्हणाले. तसेच व्यक्ती हीच अभिव्यक्त होत असते , त्यासाठी महाविद्यालयाच्या विविध विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या प्रकाशित होणाऱ्या भितीपत्रकातून अभिव्यक्त व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
