उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे नुकसान – तत्काळ दुरुस्तीची काँग्रेसतर्फे मागणी
उदगीर (एल पी उगिले ) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, उदगीर यांना निवेदन देण्यात आले.
हे निवेदन युवा काँग्रेस उदगीर तालुका अध्यक्ष तथा जय जवान अभियान लातूरचे समन्वयक विवेक पंडितराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. त्यांच्या सोबत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आदर्श पिंपरे, तसेच सद्दाम बागवान, शरीफ शेख, सादिक सय्यद यांसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्र विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद व आमदार आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार ग्रामीण भागाची पाहणी करण्यात आली असता, खालील ठिकाणी गंभीर स्वरूपाचे नुकसान झाल्याचे आढळले
भाकसखेडा पश्चिम ते भाकसखेडा पूर्व रस्त्यावरील पुल वाहून गेला.,गंगापूर–भाकसखेडा रस्त्यावरील पुलाजवळील रस्त्याखालची माती वाहून गेली., सताळा येथे वायगाव–सुमठाणा नदीवरील पुलाजवळचा बांध फुटून पाणी शेतात शिरले.,शंभु उमरगा–सताळा पानंदरस्त्यावर पुल वाहून गेला.,करडखेल गावाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यावरील पुल वाहून गेला.या सर्व ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून शेतकरी व नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.म्हणून संबंधित विभागामार्फत तातडीने पंचनामा करून अंदाजपत्रके तयार करून दुरुस्ती व बांधकाम कार्य सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
