“आवाज दाबला, पण काम नाही!” – लाखो खर्चून बांधलेले शौचालय आजही बंद; नगरपालिकेच्या ‘बधिर’ प्रशासनावर नागरिकांचा संताप कायम
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर (गोविंद काळे): अहमदपूर नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील लाखो रुपये खर्चून बांधलेले सार्वजनिक शौचालय अजूनही बंदच आहे. “पोलीस फ्लॅश न्यूज”ने हा मुद्दा ठळकपणे उचलून (आयुष्य लाऊड धरून) प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असतानाही, नगरपालिका प्रशासनावर बातमीचा कोणताही फरक पडलेला नाही. ‘स्वच्छ शहर’चे पोकळ नारे देणाऱ्या प्रशासनाची ही बधिरता आणि बेफिकिरी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहे.
बातमी प्रसिद्ध होऊनही ‘जैसे थे’ स्थिती
शहरातील मुख्य रस्त्यावर आणि वर्दळीच्या आंबेडकर चौकात असणारे हे शौचालय अनेक वर्षांपासून बंद आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त करत, नगरपालिका प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालणारी सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात आली होती. मात्र, ही बातमी प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने शौचालय सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय आजही कायम आहे.
संपूर्ण शहरात गैरसोय कायम
केवळ आंबेडकर चौकच नव्हे, तर शहरातील कॉलेज रोड, मेन रोड, आझाद चौक, बसवेश्वर चौक, बस स्टँड समोरील भाग आणि नांदेड रोड अशा संपूर्ण शहरातच सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. याचा सर्वाधिक फटका महिलांना, शाळेतील-कॉलेजमधील मुलींना आणि तालुक्यातून कामानिमित्त येणाऱ्या लोकांना बसत आहे.
व्यापारी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बंद शौचालयाच्या शेजारी असलेल्या एकमेव मुतारीत घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचे ढिगारे जमा झाले आहेत. या गंभीर अस्वच्छतेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. तसेच, नैसर्गिक विधींसाठी सोय नसल्याने अनेक नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना गंभीर मूत्रपिंडाचे आणि संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढला आहे. एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियाना’चे दावे करायचे आणि दुसरीकडे शहराच्या मुख्य भागातील मूलभूत सुविधांकडे इतके दुर्लक्ष करायचे, हा नगरपालिकेचा दुटप्पीपणा स्पष्टपणे दिसत आहे.
आंदोलनाचा इशारा कायम
”प्रशासनाला जनतेच्या सोयी-सुविधा आणि आरोग्याशी काही देणेघेणे नाही,” असा संतप्त आरोप करत नागरिकांनी प्रशासनाच्या या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या बेफिकीर प्रशासनाविरोधात तातडीने बंद शौचालय सुरू करून नियमित स्वच्छता न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी पुन्हा एकदा दिला आहे.
