संवाद कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज – डॉ. बेद्रे
उदगीर (एल पी उगीले) विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तसेच व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्य आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. असे प्रतिपादन हरीसिंग गौर विद्यापीठ, सागर मध्यप्रदेश येथील मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. आर. टी. बेद्रे यांनी केले. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘इंग्रजी भाषेतील संवाद कौशल्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजीव सूर्यवंशी होते. व्यासपीठावर प्रा. डॉ. कमलाकर गव्हाणे, प्रा. राजा मुदुडगे, प्रा. प्रविण अंबेसंगे, प्रा. व्ही. डी. काकनाळे, प्रा. ए. सी. बिरादार, प्रा. शिवनंदा रोडगे, प्रा. डॉ. विजयालक्ष्मी प्रसन्ने, प्रा. बालाजीप्रसाद घाळे व प्रा. शादूल शेख आदी उपस्थित होते. डॉ. बेद्रे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, विचार आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संवाद कौशल्य आवश्यक आहे. ऐकणे, वाचणे, बोलणे आणि लिहिणे हे संवाद कौशल्याचे महत्त्वाचे घटक असून, इंग्रजी भाषेतील व्याकरणाचे ज्ञान व सतत सराव यामुळे कौशल्य अधिक प्रभावी होते. अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. संजीव सूर्यवंशी म्हणाले की, इंग्रजी भाषा आणि उत्तम संवाद कौशल्याच्या आधारे विद्यार्थी ज्ञानविज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन व माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात यश मिळवू शकतात. जागतिक पातळीवरही रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. प्रभावी संवाद कौशल्यामुळे नव्या संस्कृतीशी व लोकांशी संपर्क प्रस्थापित करता येतो, म्हणून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतील बारकावे व वाक्यरचनेचा अभ्यास करून संवाद कौशल्य आत्मसात करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. कमलाकर गव्हाणे यांनी केले, तर आभार प्रा. बालाजीप्रसाद घाळे यांनी मानले.
