सौ.सविता कदम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
उदगीर (एल पी उगीले)
शिक्षण क्षेत्रातील गुणवंत व समर्पित शिक्षकांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आयोजीत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य स्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अतनूर येथील रहिवासी सौ. सविता मंगलबाई व्यंकटराव कदम यांना नुकताच मुंबईतील नरिमन पॉईंट येथील टाटा नाट्यगृहात आयोजित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्याचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल तसेच शिक्षण संचालक महेश पालकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानापुरी येथील उपक्रमशील शिक्षिका सविता मंगलबाई व्यंकटराव कदम यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सविता कदम या अध्ययन, अध्यापन क्षेत्राच्या पवित्र ज्ञानदानाच्या प्रवासात केवळ शैक्षणिक अध्यापनावर भर न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा व शिक्षणातील आधुनिक साधनांचा योग्य वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेत विद्यार्थ्यांनाही स्पर्धेत भाग घेऊन यश प्राप्त करून दिले आहे. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
या पुरस्काराबद्दल गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे, मुख्याध्यापक नरवाडे , प्रभारी केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापिका मुदखेडे, आदर्श केंद्रीय मुख्याध्यापक तथा विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक व्यंकटराव कदम, मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी सौ.संगीता शरद पकोले, सौ.रुक्मिणी भारगुडे, सविता रमाकांत तुंबरफळे आदर्श शिक्षिका, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर ज्ञानेश्वर कदम, राज्य परिवहन मंडळाच्या अधिकारी सौ.जान्हवी दत्तात्रय सावंत, प्रोजेक्ट अधिकारी परमेश्वर कदम, अतनूर चे सरपंच चंद्रशेखर पाटील, शिवसेना उबाठा चे जळकोट तालुका प्रमुख विकास सोमुसे-पाटील, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर येवरे-पाटील, कुणबी मराठा सेनेचे शिंदे पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मुंजेवार आदी मान्यवरांनी अभिनंदन केले. व अतनूर ग्रामस्थांच्या व शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुरस्कार स्वीकारताना सविता कदम यांनी आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिले. त्यांच्या मते हा मिळालेला पुरस्कार हा वैयक्तिक सन्मान नसून, तो संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
