मराठवाड्याच्या संकटात शेतकऱ्यांसोबत आनंदाने दिवाळी साजरी करा!यशवंत विद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यांचा परभणी आकाशवाणीवरून कळकळीचा संवाद
अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो एकर जमीन पाण्याखाली गेल्याने सध्या दुष्काळाचे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी यासाठी समाजातील सर्व घटकांनी त्यांच्यासोबत उभे राहावे, असे आवाहन अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाचे कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी परभणी आकाशवाणी केंद्रावरून केले. खळुरे यांनी पूर परिस्थिती आणि ओल्या दुष्काळाबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आव्हान केले. यावेळी विद्यालयातील ५ विद्यार्थ्यांनी दिवाळी सणातील विविध दिवसांचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करावी, यावर संवाद साधला. चैतन्य पांडुरंग उगिले याने वसुबारस-धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशीबद्दल माहिती दिली. कु. वैष्णवी बळवंत बोंडगे हिने आकाशकंदील व पणती सजावट यावर संवाद साधला. कु. श्रुती बापुराव कांबळे हिने लक्ष्मी पूजन व पाडवा याबद्दल माहिती दिली. कु. रितीशा शरद करकनाळे हिने भाऊबीज या दिवसाचे महत्त्व पटवून दिले, तर कु. समीक्षा बालाजी तुडमे हिने पर्यावरणपूरक व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्यावर सविस्तर माहिती दिली. सांस्कृतिक विभागाचे डॉ. शरद करकनाळे यांनी वर्षभरातील सांस्कृतिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे नीतिमूल्ये व संस्कार यावर भाष्य केले. कलाशिक्षक महादेव खळुरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम यशस्वी झाला. परभणी आकाशवाणीच्या बालमंडळ या कार्यक्रमातून दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३५ वाजता या संवादाचे प्रसारण होणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव डी.बी. लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र पैके, सहसचिव डॉ. सुनिता चवळे, प्राचार्य गजानन शिंदे, उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे आणि शिवाजी सुर्यवंशी आदींनी कौतुक केले.
