प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलोफर शेख पूर्ण ताकतीने लढतील – शहाजहान शेख
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष आपापले अस्तित्व राखण्यासाठी धडपडत आहेत. त्या स्पर्धेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी निलोफर शहाजहान शेख यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकतीने लढतील आणि जिंकतील असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजहान शेख यांनी व्यक्त केला आहे.
उदगीर शहरातील भोसले कॉम्प्लेक्स मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंग, रवी बेळकुंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बिरादार ताई यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार उपस्थित होते.
सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी लढा देणे हे बच्चू कडू यांचे ध्येय आहे. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही देखील उदगीर शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. केवळ जनतेच्या पाठिंबावरच प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आपण उमेदवार उभे केले आहेत. त्यांना जनतेने भरभरून प्रेम द्यावे. एका बाजूला धनशक्ती चा लढा आहे, तर दुसऱ्या बाजूला हा जनशक्तीचा लढा ठरेल, पारंपरिक राजकीय पक्षाचे उमेदवार आज पैशाचा पाऊस पडतील मात्र उद्या सर्वसामान्य माणसाला कोणीही विचारणार नाही. गेल्या कित्येक वर्षापासून उदगीरच्या विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. विस्तारित झालेल्या शहरातील नागरिकांना या गोष्टीचे दुःख प्रामुख्याने जाणवते आहे. कित्येक प्रभागामध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास केला असून आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठीच प्रहार जनशक्ती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचे समाजकार्य डोळ्यासमोर ठेवून प्रहारचा प्रत्येक सैनिक काम करतो आहे. सर्वसामान्य माणूस आणि दिव्यांगांसाठी या पक्षाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. याची जाणीव ठेवून उदगीरकरांनी या वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाला संधी द्यावी. असेही आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजहान शेख यांनी याप्रसंगी केले आहे. पत्रकार परिषदेच्या आभार प्रदर्शन रवी बेळकुंदे यांनी केले.
