कासार शिरशी व मुरुड येथे लातूर पोलिसांच्या रक्तदान शिबिरात २०५ रक्तपिशव्यांचे संकलन.
लातूर (एल पी उगीले) समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेले पोलीस केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून समाजसेवेच्या प्रत्येक क्षेत्रात आपली संवेदनशील भूमिका बजावत आहेत. याच सामाजिक बांधिलकीची प्रचिती लातूर जिल्हा पोलीस दलाने पुन्हा एकदा दिली आहे. “रक्तदान हेच जीवनदान” या उदात्त विचारातून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कासार शिरशी व मुरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल २०५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी संघर्ष करावा लागतो. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती किंवा विविध गंभीर आजारांमध्ये रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्तदात्यांनी दिलेली रक्ताची एक पिशवी एखाद्याला नवसंजीवनी देऊ शकते. हीच जाणीव मनात ठेवून शेकडो नागरिक, पोलीस अधिकारी,अंमलदार, युवक आणि सामाजिक कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले.
लातूर पोलीस, इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित डॉ. भालचंद्र ब्लड सेंटर, लातूर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात कासार शिरशी येथे १०२ तर मुरुड येथे १०३ अशा एकूण २०५ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दोन्ही ठिकाणी समाजसेवेचा एक प्रेरणादायी उत्सवच पाहायला मिळाला. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन यांच्या “वन हेल्मेट वन लाईफ” या उपक्रमाचे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला मोफत हेल्मेट प्रदान करून रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षेचाही महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. एखाद्याला रक्तदानातून जीवनदान देताना स्वतःचे जीवनही सुरक्षित ठेवण्याची जाणीव या अभिनव उपक्रमातून निर्माण करण्यात आली.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान होते. कारण त्यांनी केवळ रक्तदान केले नव्हते, तर एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या जीवनासाठी आशेचा किरण निर्माण केला होता. समाजातील सकारात्मक बदलांसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे रक्तदान ही केवळ गरज नसून सामाजिक जबाबदारी आहे, हा संदेश या शिबिरातून प्रभावीपणे देण्यात आला.
लातूर जिल्हा पोलीस दल, रेडक्रॉस सोसायटी आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सातत्याने राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम जिल्ह्यात जनजागृती निर्माण करण्याबरोबरच नागरिक आणि पोलिसांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करत आहेत. रक्तदान आणि रस्ते सुरक्षा या दोन महत्त्वपूर्ण विषयांची प्रभावी सांगड घालणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
२०५ रक्तपिशव्यांच्या स्वरूपात जमा झालेला हा अमूल्य रक्तसाठा अनेक गरजू रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरणार असून, “सेवा, संवेदनशीलता आणि समाजहित” या लातूर पोलिसांच्या कार्यतत्त्वाची पुन्हा एकदा प्रचिती या उपक्रमातून आली आहे.
