कष्ट आणि जिद्दीच्या बळावर व्यवसायात यश मिळते – शिवाजीराव सूर्यवंशी
अहमदपूर (गोविंद काळे) : व्यवसायात मी पणा न येऊ देता, न लाजता कुठल्याही प्रकारचा व्यवसाय माणसाने केला पाहिजे आणि ज्या व्यवसायामध्ये इमानदारीने कष्ट करून जिद्दीने व्यवसाय केला तर त्यात शंभर टक्के यश मिळते असे स्पष्ट प्रतिपादन अहमदपूर येथील उद्योजक तथा कोमल डिझायनर साडी सेंटरचे यशस्वी संचालक शिवाजीराव सूर्यवंशी यांनी केले. ते महात्मा फुले महाविद्यालयात व्यवसाय समुपदेशन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर विचार मंचावर शिवाजीराव सूर्यवंशी यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. डी. एन. माने, डॉ. एस. एच. गर्जे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना शिवाजीराव सूर्यवंशी म्हणाले की, जीवनात कष्टाशिवाय काहीच मिळत नाही आणि कष्ट करत असताना आपली नियत ही चांगली असावी लागते न लाजता आपण जर व्यवसाय सुरू केला आणि इमानदारीने कष्ट घेतले तर आपण व्यवसायात यशस्वी होऊ शकतो असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शिवाजीराव सुर्यवंशी यांनी उत्तम माणसं जोडून व्यवहार वाढविला हा व्यवसाय कठिण परिश्रमाशिवाय शक्य नव्हता. त्यांनी कठीण परिश्रम घेऊन अहमदपूरच्या उद्योग क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ. डी. एन. माने यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. माराती कसाब यांनी व आभार डॉ.एस.एच. गर्जे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
