व्यक्तिमत्व विकासासाठी भाषिक संवाद कौशल्य आवश्यक – डॉ. पांडुरंग शितोळे

अहमदपूर (गोविंद काळे) : ” भाषा हे मानवाच्या विकासाचे प्रमुख साधन असून, प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वी होण्यासाठी भाषेचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. दैनंदिन जीवनात भाषेचं उपयोजन करताना अत्यंत कुशलतेने केले पाहिजे. व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत भाषिक संवाद कौशल्य आवश्यक आहे, ” असे प्रतिपादन लातूर येथील इंग्रजीचे अभ्यासक डॉ. पांडुरंग शितोळे यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आॅनलाईन विद्यार्थी प्रबोधन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रबोधन सत्रात प्रमुख पाहुणे प्रा डॉ.शितोळे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते.
पुढे बोलताना डॉ. शितोळे म्हणाले की, आजच्या काळात बहुभाषिकता महत्त्वाची असून मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषेचे ज्ञानही आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील म्हणाले की, इंग्रजीच्या माध्यमातून जग जवळ आले असून, युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात इंग्रजी भाषेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अतिश आकडे यांनी केले तर डॉ. मारोती कसाब यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.