सामाजिक एकात्मतेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार गरजेचे – बाळासाहेब पाटोदे
उदगीर (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर केलेले कार्य हे सर्वसमावेशक आणि सामाजिक एकता जपणारे ,समाजाला दिशा देणारे असे आहे. त्यांच्या विचारावर आज जर चालू लागलो तर समाजामध्ये एकता निर्माण होईल .अध्यात्मिकता निर्माण होईल. असे विचार भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी पतीच्या मृत्यूनंतर खचून न जाता समाजातील सर्वसामान्य माणसाचे हित डोळ्यासमोर ठेवून जनतेला आपल्या लेकरा सारखे सांभाळावे. या विचाराने सत्तेची सूत्रे हाती घेतली. पूर्ण राज्यात सर्वसमावेशक आणि सर्वांना न्याय मिळेल अशा पद्धतीचे कार्य केले. देशभरातील अनेक मंदिराचा जीर्णोद्धार करून अध्यात्मिक महत्व वाढवले. तसेच परमेश्वराबद्दलचे प्रेम आणि निष्ठा वाढवण्याच्या दृष्टीने मोलाची कामगिरी केली . त्यासोबतच जमीन महसूल नोंदीसाठी सात आणि बारा चा उतारा ही नवीन पद्धत त्यांनी अमलात आणली. जनतेला लुबाडणाऱ्या लोकांपासून सर्वसामान्य माणसाचे संरक्षण व्हावे, यादृष्टीने दरोडेखोरांवर जबरदस्त वचक ठेवला. चोरी, दरोडेखोरच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कायदे निर्माण करून जनसामान्यांचे रक्षण केले.
चांगले करण्यासाठी अत्यंत निर्धाराने अनेक चांगल्या निर्णयाची त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी करून दाखवली. लोक उपयोगी कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. देशभरात सर्वसामान्य माणूस प्रवास करत असताना त्याला कुठे अडचणी येऊ नयेत. याचा विचार करून, प्रवासासाठी अनेक ठिकाणी धर्मशाळा उभारल्या, त्यांच्या निवाऱ्याची सोय केली. अनेक ठिकाणी घाट बांधले. अशा पद्धतीचा आदर्श राज्यकारभार त्यानी करून दाखवला. थोर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने युवकांनी त्यांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा निर्धार करावा. आणि प्रेरणा घ्यावी. असेही आवाहन बाळासाहेब पाटोदे यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे,सतीश पाटील मानकीकर, काँग्रेस पक्षाचे शिवकुमार कांबळे ,बलांडे यांच्यासह युवा आघाडीचे आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते तसेच अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा अहिल्यादेवी होळकर यांच्यावर श्रद्धा ठेवणारे भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
