फुले महाविद्यालयाने फुलविली बालाघाटाच्या पायथ्याशी बाग
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या परिसरात साकारलेल्या हिरवाईमुळे शुद्ध हवा मिळून विद्यार्थ्यांंचा श्वास मोकळा होतो आहे. त्यामुळे मानसिक दृष्ट्या विद्यार्थ्यांची अध्ययन तर प्राध्यापकांची अध्यापन प्रक्रिया प्रसन्न होऊन ही हिरवाई ( गार्डन) सकारात्मक उर्जेचा स्त्रोत बनली आहे.
अहमदपूर शहर हे मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात शैक्षणिक दृष्ट्या सर्वोत्तम शहर आहे.हे आत्तापर्यंतच्या शालेय ते महाविद्यालयीन गुणवत्तेवरून सिद्ध झाले आहे. येथील महात्मा फुले महाविद्यालयाने , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या, तसेच प्राध्यापकांच्या सहकार्याने आणि एन. एस.एस. विभागाच्या वतीने अहमदपूरच्या निसर्ग नर्सरीच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक अशी १४३८झाडे व १५३ कुंड्यांच्या माध्यमातून अहमदपूर शहरातला लाखो टन कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेऊन तेवढाच प्राणवायू वातावरणात सोडून शुद्ध हवा देत आहे.यातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन व प्राध्यापकांच्या अध्यापन प्रक्रियेत सकारात्मक उर्जेचा स्त्रोत बनली आहे.
अहमदपूर शहर हे एखाद्या पक्षाने ध्यानस्थ बसावे तशा आकारात बसले आहे. राष्ट्रीय महामार्गावर बसलेल्या या शहराच्या उशाला नजिकच्या नांदेड जिल्ह्यातील विराट असे लिंबोटी धरणाचे योगदान लाभलेले आहे. आता या धरणाचे पाणी अहमदपूरला आल्यानंतर येथील पाण्याची वाणवा थांबेल, असे असले तरी येथील भूगर्भात पाण्याचा साठाही आहेच. त्यावर कमी अधिक प्रमाणात येथील नागरिकांची सोय होते.
नगर पालिकेकडून शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यातून पाण्याची साठवण नागरिक करतात. या साठवणीतूनच वृक्षप्रेमी आपल्या वृक्षांची जोपासना करतात. पैकी महात्मा फुले महाविद्यालय हे एक महाविद्यालय आहे.या महाविद्यालयाने अहमदपूर येथील प्रथितयश डोंगरे यांच्या निसर्ग नर्सरी आणि प्राध्यापकांच्या सहकार्याने तसेच . महाविद्यालयातील, प्राचार्य, प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचा-यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट म्हणून दिलेले वृक्ष आणि तालुक्यातील कै. तुळशीराम पवार महाविद्यालय हाडोळती येथील प्राध्यापक व विद्यमान प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश गंगथडे क्रीडा संचालक डॉ. गोविंद कलवले यांनी दिलेल्या (०२) महात्मा फुले महाविद्यालय किनगाव येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बळीराम पवार (०२ ), डॉ. बी. के. मोरे (२), संजना ससाणे (१) , दयानंद बिरादार (५), यांच्यासह महाविद्यालयातील प्राचार्यांसह प्रत्येक प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचा-यांनी आप- आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिलेले एकेक वृक्ष सप्रेम भेट म्हणून दिलेल्या वृक्षांसह सद्यः स्थितीत विविध प्रजातींची सुमारे १४३८झाडं आहेत. अशी विविध स्तरांतून मिळणारी वनश्रीमंती फार कमी महाविद्यालयांना लाभलेली असते. त्यापैकीच एक फुले महाविद्यालय आहे.
अहमदपूर शहर हे ध्यानस्थ बसलेल्या पक्षासासारखे आहे. त्यामुळे पक्षांना बसण्यासाठी, विहार करण्यासाठी, त्यांना एक आधार मिळाला आहे.शिवाय महात्मा फुले महाविद्यालयाचा परिसर उन्हाळ्यात कितीही तापला, तरी तो लवकर थंड होतो,हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.
प्रदूषण वाढले, पण… अहमदपूर शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर आहे. शहरातून दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात होत असते.पण अहमदपूर शहरात रोटरी क्लब, नगरपालिका आणि पर्यावरण प्रेमींनी यावर आळा आणून शहराचे तापमान नियंत्रित ठेवले आहे, हे विशेष होय. मागील दहा- पंधरा वर्षात शहाराची लोकसंख्या वाढली पण त्या तुलनेत वृक्षांची संख्या वाढली नव्हती. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढू लागले होते. शहराचा हवा निर्देशांक कमी अधिक होत होता. शहरातली झाडे पूर्ण शहराच्या हवेची गुणवत्ता शुद्ध ठेवणे शक्य नव्हती, त्यामुळे जागरूकतेने महात्मा फुले महाविद्यालयांने काळाची व जनतेला शुद्ध हवा देण्यासाठी सरसावले. या महाविद्यालयाने नऊ वर्षात १४३८ वृक्ष लावून थांबले नाही तर १५३ पर्यावरण पूरक वृक्ष कुंड्या लावल्या आहेत. महाविद्यालयाच्या परिसरात, प्रत्येक दालनाच्या समोर, आजूबाजूला, सभागृहात व सभागृहाबाहेरच्या बाहेरील वातावरणात प्राणवायूची भरपूर प्रमाणात संपन्नता लाभलेली आहे. त्यामुळे संख्येने भरपूर असलेली ही वृक्षसंपदा वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात.
झाडांना जेवढी पाने जास्त तेवढा ऑक्सिजन जास्त…. महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार म्हणाले की, झाडे किती कार्बन डाय ऑक्साइड शोषून घेतात तसेच ते किती ऑक्सिजन देतात, हे मोजणे कठीण आहे. मात्र, जेवढी पाने जास्त तेवढी प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया वेगाने व जास्त होते. त्यासाठी झाडांना जास्त कार्बन डायऑक्साईड लागतो. त्यामुळे महाविद्यालयाच्या दृष्टीने १४३८ झाडे व १५३ कुंड्या ही जमेची बाजू आहे. त्यात अजून भर पडावी, अशी अपेक्षा आहे. प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
शहराचा आकार ध्यानस्थ बसलेल्या पक्षासासारखा आहे. त्यामुळे पशू – पक्ष्यांना महाविद्यालयाची वनराई म्हणजे त्यांचे वसतिस्थान बनले आहे. वाहनांच्या वर्दळीने आजूबाजूचा परिसर प्रदूषित झाला तरी महाविद्यालयाच्या झाडांमुळे परिसरातील हवा शुद्ध झाल्याने चोवीस तास आमचे विद्यार्थी ताजेतवाने राहतात. -डॉ. डी. डी.चौधरी, उपप्राचार्य, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर
अहमदपूर शहराची भौगोलिक रचना अशी आहे, की शहर प्रदूषित झाले तरीही हवा लवकर पुन्हा शुद्ध होते. यात शहरातील वृक्षसंपदा यांचाही मोठा वाटा आहे. आगामी काळात शहरात वृक्ष लागवड आणखी वाढवावी लागणार आहे. वृक्ष वाढले, तर प्रदूषण कमी होईल. – डॉ. अनिल मुंढे, केंद्र संयोजक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यास केंद्र , महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर_
अहमदपूर शहरातील लोक आणि महात्मा फुले महाविद्यालयाचा स्टाफ, कर्मचारीवर्ग खूप सूज्ञ आहे. ते शहर व महाविद्यालयात झाडांची जोपासना करतात. शहरात पर्यावरण प्रेमी आहेत. विविध संघटना आहेत. त्यामुळेही अहमदपूर शहराचा पर्यावरण समतोल राखला जातो आहे. – डॉ. पी. डी.चिलगर, एन. एस. कार्यक्रमाधिकारी , महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर जि.लातूर
