वारकरी भवन बांधकामाला निधी द्या – मागणी

वारकरी भवन बांधकामाला निधी द्या - मागणी

उदगीर (एल.पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी,श्रद्धास्थान हत्ती बेट तसेच तालुक्यातील इतर प्रेक्षणीय आणि भक्तीचे वातावरण असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परत आलेल्या वारकऱ्यांना, भक्तांना, भाविकांना थांबण्यासाठी वारकरी भवन बांधणे गरजेचे आहे. तसेच उदगीर शहरातही अनेक किर्तन, प्रबोधन, व्याख्यान अशा स्वरूपाचे अध्यात्मिक कार्यक्रम घेतले जातात. अशा कार्यक्रमासाठी तालुक्यातून आणि पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांना मुक्काम करता यावा, कारण रात्री बेरात्री कीर्तन, व्याख्यान संपल्यानंतर परत जाण्यासाठी गाड्या नसतात.
या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून वारकरी संप्रदायाच्या वतीने उदगीर शहरात वारकरी भवन बांधकाम करण्यात यावे. त्यासाठी योग्य तो निधी उपलब्ध करून द्यावा. या संदर्भात अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे कार्यसम्राट आ. संजय बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदन देतेवेळी वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाध्यक्ष सुनील महाराज जवळे, वारकरी महामंडळाचे प्रवक्ते उद्धव महाराज हैबतपुरे, सचिव गणेश मुंडे डोंगरशेळकीकर, उपाध्यक्ष बालाजी बिरादार, बाबुराव माशाळकर, विनायक शिंदे, बळवंत सावळे, माणिक कसबे ,भगवान पंडित, गंगाराम केंद्रे, श्रीधर उदासी शाम डावळे, विशाल जाधव, सतीश जावळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विकास मूर्ती आमदार संजय बनसोडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन वारकरी संप्रदायाची मने जिंकली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!