जीवनात आनंद मिळवण्यासाठी साधना आवश्यक आहे – स्वाती खाड्ये
लातूर (एल.पी. उगिले) : आपण सर्वचजण केवळ क्षणिक सुखाच्या मागे लागलेलो आहोत. पैसा, पद, प्रतिष्ठा हा क्षणिक आनंद आहे. जीवनात दिर्घकाळ आत्मिक आनंद मिळवण्यासाठी साधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या संत स्वाती खाड्ये यांनी केले.
लातूर येथील बालाजी मंदिरातील सत्संग भवनात आयोजीत ‘आनंद आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी संत दिपाली मतकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगीतले की, आपण धर्म आणि संस्कृती पासून दूर जात आहोत. पैसा, गाडी, बंगला यासाठी आपण आयुष्यभर धडपडत आहोत. परंतु, ते क्षणिक सुख आहे. आपला भारत ही अध्यात्मिकदृष्ट्या जगाची राजधानी आहे. परंतु, आपण अध्यात्म आणि साधना यापासून दूर गेलो आहोत.
आनंदी जीवन जगण्यासाठी अध्यात्म आणि साधना आवश्यक आहे. आपल्या कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप करावा. सत्ययुगामध्ये ईश्वरप्राप्तीचा मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग होता. त्रेतायुगामध्ये ध्यानमार्ग होता. द्वापारयुगामध्ये कर्मकांड होते. परंतु, कलियुगात केवळ नामसाधनाच होणार आहे.
आजही काहीजण कर्मकांडामध्ये अडकलेले आहेत त्यामुळे सर्वांनी जीवन आनंदी जगण्यासाठी नामसाधना करावी, नामजप साधना करूनच ईश्वरप्राप्ती करून घेता येईल, असेही त्यांनी सांगीतले.
