गटविकास अधिकारी यांचा ग्रामसेवकांच्या बदल्यांमध्ये मनमानी कारभार

गटविकास अधिकारी यांचा ग्रामसेवकांच्या बदल्यांमध्ये मनमानी कारभार

लातूर (प्रतिनिधी) : लातूर पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी हे त्यांच्या मर्जीनुसार शासकीय नियम धाब्यावर बसवून आपल्या नात्यातील व मर्जीतील ग्रामसेवकांना त्यांच्याकडे स्वतंत्र मोठ्या ग्रामपंचायतीचा कार्यभार असताना सुद्धा लातूर शहरालगतची मोठी आर्थिक उलाढाल असणारी गावे ज्या ग्रामसेवकांनी शहरालगतच्या गावांमध्ये 20 वर्ष कालावधी ची नोकरी केली आहे अशा ग्रामसेवकांना परत परत तीच गावे नियम धाब्यावर बसवून देत आहेत.

त्याचबरोबर इतर गावातील लोकप्रतिनिधी ज्यावेळी गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक बदली व मागणी साठी जातात तेव्हा हेच गटविकास अधिकारी त्या लोकप्रतिनिधींना शासकीय नियमावलीचा पाट शिकवतात कालावधी पूर्ण झाल्याशिवाय बदली करता येत नाही, एकाच ग्रामसेवकाकडे अतिरिक्त कार्यभार दिल्यावर कामांमध्ये नियोजित पणा येत नाही, नागरिकांच्या तक्रारी वाढतात त्यामुळे ग्रामसेवक बदलता अथवा अतिरिक्त कार्यभार देता येत नाही, असे सांगतात मग इतरांना वेगळा व मर्जीतील, नातलग ग्रामसेवकांना वेगळा नियम असे का.

असाच प्रकार लातूर तालुक्यातील चिंचोली ब येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक हणमंत चलमले हे एक वर्षापासून चिंचोली येथे कार्यभार सांभाळत आहेत तरी पण लगेच त्यांना पुन्हा हरंगुळ येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार गटविकास अधिकारी यांनी दिला त्यामुळे चिंचोली ब हे लोकसंख्येने मोठे गाव असल्याने तेथील नागरिकांना ग्रामपंचायती संबंधित कामासंदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अशी परिस्थिती तालुक्यातील इतर गावात ही गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे उद्भवलेली आहे.

एवढेच नाही तर गटविकास अधिकारी यांच्या मर्जीतील व नातेवाईक असलेले ग्रामसेवक नागरिकांना म्हणतात की तुम्हाला आमची तक्रार कुठे करायची असेल तिथे करा वरिष्ठ अधिकारी आमचे नातलग आहेत आम्ही ठरवले तर तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीचा पदभार कधीही स्वीकारु शकतो अशी मानसिकता काही ग्रामसेवक कर्मचाऱ्यांची गटविकास अधिकारी यांच्या मनमानी धोरणामुळे झालेली आहे. गटविकास अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील बऱ्याच गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व बाबींकडे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी हे या मनमानी करणार्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. अशी तक्रार लातूर विधानसभा शिवसेना क्षेत्र प्रमुख राजकुमार सुरवसे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

About The Author