उदगीर किल्याचे काम दर्जेदार करा – आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्याच्या सिमेवर असलेल्या उदगीर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची जतन दुरुस्ती व्हावी, माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन किल्ला दुरूस्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करुन घेतला होता. त्याचे पहिल्या टप्प्यातील कामाची सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील दुरूस्तीचे काम दर्जेदार व वेळेत पुर्ण करा अशा सुचना माजी पर्यावरण मंत्री तथा उदगीरचे आ.संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.ते उदगीर शहरातील शासकीय नविन विश्रामगृह येथे आयोजीत किल्ला संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, जतन सहाय्यक नितीन चारोडे, ज्युनिअर इंजिनिअर अन्सारी,वास्तु विशारद तेजस्विनी आफे, गिरी महाराज आदीसह संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन भाविक येथे किल्ला पाहण्यासाठी व उदागिर बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी गुढी पाडव्याला येथे मोठी यात्रा भरते. यावेळी लाखो नागरिकांची येथे मोठी गर्दी असते, अशा या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची दुरूस्ती व्हावी. म्हणून आपण विशेष प्रयत्न करुन शासनाकडुन निधी उपलब्ध करुन घेतला असुन सदर किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाचा कालावधी हा जवळपास 18 महिन्याचा आहे. या वेळेतच सदर काम पूर्ण करावे अशा सूचनाही यावेळी आ.बनसोडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या परिसरातुन उदागिर बाबांच्या मंदिराकडे जाणा-या भागातील बुरुजाचा भाग पावसाचे वेळी ढसाळला होता, त्याची व्यवस्थित पाहणी करून त्याचे दुरुस्तीचे काम काम चालू असल्याचे सांगितले. या आढावा बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
