हायटेक स्कूलच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडवले जातेय – आ. संजय बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : देशाचे भवितव्य घडवण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून केले जाऊ शकते. ते पवित्र कार्य हायटेक इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवले जात असल्याचे गौरव्दगार माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते “नई उडाण”या हायटेक इंग्लिश स्कूल च्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी भेट दिली असता ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा. प्रवीण भोळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शेख समीर, जळकोटचे तालुकाअध्यक्ष अर्जुन आगलावे, जिल्हा परिषद माजी सदस्य तथा सरपंच ज्ञानेश्वर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब मरलापल्ले, फय्याज आत्तर, प्राचार्य फरजाना मंगरुळे, बालाजी धमणसुरे, बालाजी मोरे, निजामुद्दीन जागीरदार, रंजीत जाधव,एम.जी. मोमीन,समिरोद्दीन बंदेली, पाशा मिर्झा, शफी अत्तार, जागीरदार सर, माजिद देशमुख, मुजीब खतीब, मिर्झा कैफ मंगरुळे, अभिजीत औटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, केवळ चार वर्षांमध्ये हायटेक इंग्लिश स्कूलने उदगीर शहरांमध्ये शैक्षणिक दर्जा दाखवून दिला आहे. उदगीर शहर हे शिक्षणाची पंढरी आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी, शाळेच्या विकासाच्या कामासाठी आपण सदैव प्रयत्न करू, प्राचार्यांनी अकरावी, बारावी साठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यक्षेत्रात शाश्वत विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. अल्पसंख्यांक समाज बांधवांसाठी हायटेक च्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या शालेय विकासासाठी तुमच्या कुटुंबातील एक घटक समजून जे सहकार्य लागेल ते सांगा, आपण सर्वतोपरी सहकार्यासाठी तयार आहोत. असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रास्ताविक भाषणातून संयोजक महेबूब मंगरुळे यांनी पंधरा विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा केवळ चार वर्षात टॉप टेन मध्ये समाविष्ट झाली आहे. आज या शाळेचा शंभर टक्के निकाल असून कित्येक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शाहू महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. केवळ चार वर्षाच्या कार्यकाळात हा प्रगतीचा टप्पा गाठला आहे. विशेष बाब म्हणजे विद्यमान आ. संजय बनसोडे हे आमदार नसताना त्यांनी आठवीच्या वर्गाला मान्यता मिळवून देण्यासाठी केलेले उल्लेखनीय सहकार्य ही संस्था कायम लक्षात ठेवणार आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच छोट्याशा रोपट्याचे आज हे वटवृक्षात रूपांतर झाले आहे, असे सांगितले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन दाखवून पालकांची आणि प्रेक्षकांची मनी जिंकली. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
