जगातील महिला अबला नसून सबला आहेत – रेखा हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : आज जगातील चित्र पाहिले तर आपणास सामाजिक, शैक्षणिक,कृषी, क्रीडा तथा राजकीय क्षेत्रात महिला आघाडीवर दिसतात.एवढेच नाही तर देशाची सूत्रे सुद्धा महिला सक्षमपणे चालविताना आपण पाहतोय.म्हणजेच आजच्या काळातील महिला या अबला नसून सबला आहेत असे प्रतिपादन भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्राचार्या रेखाताई अशोक हाके पाटील यांनी केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक,कृषी, क्रीडा तथा राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सुषमा स्वराज पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नुकतेच उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या विलास नरवटे यांच्या मातोश्री कलावती बळीराम नरवटे, दिपाली निकेतन कदम, लातूरच्या प्रसिद्ध विधीज्ञ ॲड तेजस्विनी बळवंत जाधव,आटोळ्याच्या सरपंच रेणुका तोडकरी, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सुरेखा पुरी, प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या छाया बहनजी, ॲड मानसी हाके पाटील, सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शिवालिका हाके, संगिता आबंदे पाटील,अनुसया फड, जयश्री केंद्रे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना रेखा हाके म्हणाल्या की आजची स्त्री चूल आणि मूल याही पलीकडे जाऊन कार्य करत आहे. आजची स्त्री पूर्णतः स्वावलंबी झालेली आहे त्याचप्रमाणे महिला आता कोणत्याही क्षेत्रामध्ये पुरुषांपेक्षा कमी नाहीत. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात महिलांनी आपली छाप सोडली नाही. याप्रसंगी लातूरच्या प्रसिद्ध विधीज्ञ ॲड तेजस्विनी जाधव यांनी वेगवेगळ्या विषयावर कायद्याची माहिती देत महिलांची होणारी कुचंबना, महिलांवर होणाऱ्या अत्याचार त्याचप्रमाणे महिला सहन करत असलेल्या गोष्टी याबाबतचा उलगडा करीत कायदा महिलांच्या बाजूने कसा आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच दिपाली निकेतन कदम यांनी सुद्धा महिला आणि शिक्षण या विषयावर महिलांच्या शिक्षणाविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर ॲड मानसी हाके यांनी महिला- शिक्षण- घर यांचा संबंध कसा असतो आणि कसा असावा याबद्दल मार्गदर्शन करताना महिला स्वावलंबी कशा कशा होत गेल्या व त्या होताना त्यांनी अडचणीवर मात कशी केली याबद्दल उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास चाकूर तालुक्यातील वनिता बावगे ,अनुश्री सांगवे, कौशल्या मुंडे ,बालिका कुरूपखेळे आणि अहमदपूर तालुक्यातील डॉक्टर मीनाक्षी करकनाळे, प्रेमा वतनी, कौशल्या पवार, विजया भुसारे, हेमा कांबळे, मंडोदरी लामतुरे आदी महिलांना सुषमा स्वराज अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शिक्षिका आणि इतर महिलांचा देखील सुषमा स्वराज पुरस्काराने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आटोळा या गावच्या सरपंच रेणुका तोडकरी यांनी केले सूत्रसंचालन दैवशाला शिंदे, कौशल्या देवकते, आशा रोडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुरेखा पुरी यांनी मानले.
