मातृभूमी महाविद्यालय आणि अनिस मार्फत संविधान वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : मातृभूमी महाविद्यालय आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्याने संविधानाबद्दल जनजागृती वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन रंगा राचुरे , यांच्या हस्ते तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश उस्तुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव माशाळकर, शिवमूर्तीअप्पा भातांब्रे, विश्वनाथ मुडपे, दीपक बलसूरकर, प्राचार्य उषा कुलकर्णी, महेश मळगे, कलावती भातांब्रे, देविदास नादरगे हे उपस्थित होते.
सर्व प्रथम संविधानातील कर्तव्य आणि अधिकार या बाबत विविध ५१ कलमाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . हे प्रदर्शन तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातुन गावोगावी जावून भरविण्यात येणार असल्याचे विश्वनाथ मुडपे यांनी सांगितले . यावेळी संविधाना बद्दल माहिती देताना विचारवंत रंगा राचूरे यांनी माणसाच्या शिक्षण , आरोग्य ,पाणी , आणि अठरा वर्षाचा झाल्या नंतर प्रत्येक हाताला काम या मूलभूत गरजा भागविण्याच्या जबाबदारी पासून राज्यसत्ता बाजूला पळतेय. आणि कल्याणकारी राज्य व्यवस्था मोडीत काढून भांडवली अर्थ व्यवस्था मानणारी राज्य सत्ता सत्तेवर येते, तेव्हा संविधानाला धोका निर्माण होतो असे सांगितले . पुढे बोलताना राचुरे यांनी म. गांधी यांनी सांगितल्या प्रमाणे फक्त कायदे करून प्रश्न सुटत नाहीत, म्हणून समाजामध्ये त्या बद्दलची चेतना आणि समज निर्माण करण्याची गरज आहे. म्हणून संविधान समजून घेण्याची गरज आहे.अन्यथा हुंडा बंदी कायद्याप्रमाणे अवस्था होईल . आम्ही प्रश्नच विचारीत नाही,एखाद्याने विचारलाच तर उत्तर देण्या ऐवजी त्याचे खच्चिकरण करून तो पुन्हा प्रश्नच विचारणार नाही. अशी व्यवस्था निर्माण करण्याचे राज सत्ता करीत असल्याने शून्याच्या शोधा नंतर कोठलाच शोध लागला नाही. यामुळे तरुणांनी प्रश्न विचारले पाहिजेत असे सांगितले.
महोत्सवाचे व संविधान दर्शन प्रदर्शनाचे उद्घाटन झाले असे घोषित केले. कार्यक्रमात उपस्थित अतिथीना संविधान ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रा.बिभिषण मद्देवाड यांना पद्मश्री डॉ.नरेंद्र दाभोळकर स्मृती उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संतोष जोशी यांनी सूत्रसंचलन केले.तर प्रा.रणजित मोरेंनी उपस्थितांचे आभार मानले.
