उदगीर विधानसभा मतदारसंघातून काळगे यांना सर्वाधिक मताधिक्य – निवृत्ती सांगवे

0
उदगीर विधानसभा मतदारसंघातून काळगे यांना सर्वाधिक मताधिक्य - निवृत्ती सांगवे

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघ हा समाजवादी विचारांचा बालेकिल्ला आहे. मध्यंतरीच्या काळात मोदी लाटेमुळे भाजपने या ठिकाणी पाय रोवले होते, मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 22 हजाराच्या मताधिक्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय बनसोडे यांना विजयी केले. आणि उदगीर हा समाजवादी विचारांच्या लोकप्रतिनिधींना प्राधान्य देतो, हे दाखवून दिले. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळेल. असा विश्वास राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या कार्यालयास भेट देण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मांजरा सहकारी कारखान्याचे संचालक तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक रवी काळे, काँग्रेस पक्षाचे जळकोट तालुकाध्यक्ष मारुती पांडे, राम स्वामी, बालाजी साळुंके, हुडगे आप्पा, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या सल्लागार विधिज्ञ रुक्मिणीताई सोनकांबळे, बागवान बिरादरीचे प्रमुख समदभाई बागवान, संभाजी तिकटे, बंजारा युवा आघाडीचे नेते सुनील चव्हाण, अयाज जहागीरदार, मुकरम जागीरदार, राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बंटी घोरपडे, मुन्ना मदारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना सांगवे म्हणाले की, डॉ. शिवाजीराव काळगे यांना ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे सुखदुःख चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून गेल्या दोन तपा पेक्षा जास्त काळ ते जनतेची सेवा करत आहेत. स्वतः ग्रामीण भागातून असल्यामुळे त्यांना ग्रामीण जनतेची, त्यांच्या प्रश्नांची माहिती आहे. लोक कितीही मोठमोठे आश्वासन देत असले तरी प्रत्यक्षात लोकांचे अश्रू पुसण्यासाठी सदैव तत्पर असणारे उमेदवार लोकांना हवे असतात, योगायोगाने असाच उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला असल्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्क्याने जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
याप्रसंगी शिवाजी काळगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मी कधीही लोकांना विसरणार नाही. समाजसेवेचा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही, उदगीर ही उदागिर बाबाची आणि शाहमहम्मद कादरी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली वस्ती आहे. योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता या भूमितील नागरिकात आहे. मी गोरगरिबांचा उमेदवार आहे. एका अर्थाने मी जनतेचा उमेदवार आहे. त्यामुळे जनता प्रचार यंत्रणा हातात घेईल. असा मला विश्वास आहे, असे सांगितले. प्रास्ताविक बंटी घोरपडे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकातून त्यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय दलित अधिकार मंच आणि दलित मुस्लिम ऐक्य संघ समाजवादी विचारांची पेरणी करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभावाची जाण असलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली जाईल. समाजातील जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि धार्मिक वाद निर्माण करणे असे कृत्य करणाऱ्यांना लोक जागा दाखवतील. असा विश्वासही व्यक्त केला. आभार प्रदर्शन रवी जवळे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!