पुस्तक हे मस्तक घडविते – प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले
मुरूम (प्रतिनीधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन संस्कृतीची जोपासना आणि वृद्धी करण्यासाठी शासनाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन कार्यशाळेचे आयोजन करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यक्रम राबवण्यात आला. सर्वप्रथम भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.
या उपक्रमाचे व्याख्याते म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्राचे संयोजक प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पुस्तक वाचन करणे ही काळाची गरज आहे. कारण पुस्तक मस्तक घडविते, घडविलेले मस्तक हे कोठेही नतमस्तक होत नाही. आज मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन संस्कृतीची जपणूक करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकाव्यतिरिक्त इतर ग्रंथाचे वाचन करून त्यावर मंथन करावे, त्याचे परीक्षण करून लेखन करावे, असे प्रतिपादन केले. सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. डॉ. सुशील मठपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथालय प्रमुख प्रा. डॉ. राजकुमार देवशेट्टे यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे असे सांगितले. या दरम्यान होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देताना म्हणाले की, या उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक परीक्षण स्पर्धा, वाचन संवाद यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. डॉ. नागोराव बोईनवाड, प्रा. डॉ. दिनकर बिराजदार, प्रा. डॉ. नरसिंग कदम, प्रा. डॉ. शीला स्वामी, प्रा. डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. राजकुमार रोहीकर, प्रा. किरणसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, श्रीमती विजया भालेराव उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे म्हणाले की, या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना यश संपादन करावयाचे असेल आणि आपली भारतीय संस्कृती जपायची असेल तर ग्रंथालयातील विविध साहित्याचे वाचन, मनन केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या भारतीय साहित्यात माणूस घडविण्याची ताकत आहे. ग्रंथालयात अनेक पुस्तकं आहेत त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे ते म्हणाले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. सुजित मटकरी, प्रा. नितीन हुलसुरे, प्रा. सचिन राजमाने, प्रा. अजिंक्य राठोड, प्रा. सदाफ अलमास मुजावर, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. योगेश पाटील, अमोल कटके, नितीन कंटेकुरे, मल्लिकार्जुन स्वामी, अर्जुन दंडगुले आदींनी पुढाकार घेतला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ .प्रतापसिंग राजपूत तर आभार प्रा. विवेकानंद चौधरी यांनी मानले.
