महा-ई-सेवा केंद्रातील लुटीच्या विरुद्ध अशोक तोंडारे यांचा लढा यशस्वी, संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल
उदगीर (एल.पी. उगीले)
उदगीर येथील महा-ई-सेवा केंद्र चालक राहुल रक्षाळे यांच्याविरुद्ध पत्रकार अशोक तोंडारे उर्फ टाटा यांनी अनेक वेळा महसूल प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. मात्र त्या संदर्भात फारशी गांभीर्याने दखल घेतली गेली नव्हती. शेवटी अशोक तोंडारे यांनी पत्रकार संघटनेकडे यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर उदगीर पत्रकार संघटनेने अशा पद्धतीने होणाऱ्या लुटीच्या विरुद्ध मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले. मुख्यमंत्री कक्षातून उदगीर शहर पोलिसांना सूचना करण्यात आल्या असून यासंदर्भात तपास करावा. अशी स्पष्ट सूचना केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हाती आलेली माहिती अशी की, उदगीर नगरपालिका व्यापारी संकुलातील राहुल रक्षाळे यांच्या महा-ई-सेवा केंद्रात पत्रकार अशोक तोंडारे हे आपल्या बहिणीच्या आधार कार्ड च्या अपडेट साठी गेले असता, त्यांच्याकडे अतिरिक्त पैशाची मागणी केली गेली. ते पैसे दिल्यानंतर देखील आधार कार्डची प्रिंट घेण्यास गेले असता पुन्हा आगाऊ पैशाची मागणी करण्यात आली. यासंदर्भात त्यांनी विचारणा केली असता त्यांना धमकावण्यात आल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित महा-ई-सेवा केंद्राच्या संचालकाने चक्क मी अधिकाऱ्यांना पैसे देतो, त्यामुळे मला पैसे जास्त घ्यावे लागतात. असे सांगितल्याचे अशोक तोंडारे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात तू कोणाकडेही तक्रार केलास तरी काहीही वाकडे होणार नाही. त्यामुळे तू अशा भानगडीत पडू नको, असा सल्ला देऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप अशोक तोंडारे यांनी केला आहे.
यासंदर्भात अशोक तोंडारे आणि काही पत्रकारांनी तहसीलदार यांना पत्र देऊन चौकशी करण्याची विनंती केली होती. चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ठोस अशी कोणतीही कार्यवाही न झाल्याने, शेवटी नाईलाज म्हणून मुख्यमंत्र्याकडे तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातून आदेश आल्यानंतर उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे महा ई सेवा केंद्र संचालक राहुल रक्षाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कलम 352, 351 (2), 351 (3) अशा पद्धतीचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक चौकशी करून शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना लाभार्थ्यांची लूट केली जाऊ नये. अशी मागणी पत्रकार संघटनेने केली आहे. अशी लूट होणार नसल्याचे वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील प्रत्यक्षात मात्र तशी लूट होत असल्याची ही तक्रार करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या पुढील तपासाकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी आणि शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी आपल्याला चार पैसे मिळावेत, या लालसेने वेळप्रसंगी अशा महा-ई-सेवा केंद्रातून अतिरिक्त पैसे मागितल्यानंतर देखील बिन तक्रार पैसे देत असल्याने, अशा लोकांची लूट करण्याची हिम्मत वाढली असल्याचे अशोक तोंडारे यांनी सांगितले आहे.
