राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक हित जोपासले जाते – संदीप शिंदे पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) :- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. युवकांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करता येते. आपल्या देशाबद्दल, नागरिकाबद्दल आपुलकी, प्रेम भावना निर्माण होते. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्टे हे सामाजिक कार्य करणे हा असतो. या कार्यातून सामाजिक हीत जोपासले जाते. महाविद्यालयाचा परिसर, आपल्या शहराचा, नगराचा परिसर स्वच्छ करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, प्रथमोचार सबंधी माहिती, नागरिक संरक्षण, पर्यावरण संवर्धन इ. कार्यक्रमाचा समावेश राष्ट्रीय सेवा योजनेत असल्यामुळे यातून सामाजिक हीत जोपासले जात असल्याचे प्रतिपादन संदीप शिंदे पाटील यांनी केले.
उदगीर येथील विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना
(एन.एस.एस) विभागाच्या वतीने मौजे देवर्जन (हत्तीबेट) ता. उदगीर येथे विशेष वार्षिक शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर व्ही. एस. कुलकर्णी, अभियंता प्रशांत संपते यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे यांनी केले.
पुढे बोलतांना संदीप शिंदे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील परिसराची स्वच्छता, सुधारणा, आरोग्य, कुटुंब नियोजन, सामाजिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या लोकांची कामे करण्यावर भर देण्यात येते. यातून युवा शक्ती देश घडविण्यात किती महत्वपूर्ण योगदान देते हे आपणास दिसून येते. युवकांनी मोठ्या संख्येने या कार्यात सहभागी झाले पाहिजे. ज्यामुळे त्यांच्यात राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, समाज सेवा ही मूल्ये रुजतात तर स्वच्छता, आत्मनिर्भरता, जबाबदारी आपुलकी, प्रेम इ. गुण अंगी निर्माण होतात असे ही ते म्हणाले.
सुत्रसंचालन प्रसाद कोंडापुरे व आभार सुयश स्वामी यांनी मानले. यावेळी रासेयो चे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
