डॉ.नरसिंग कदम बनवसनगरीचे नाव रोशन करत आहेत- कुमार कदम
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले बनवस नगरीचे सुपुत्र साहित्यिक प्रा.डॉ.नरसिंग अप्पासाहेब कदम
हे साहित्याच्या क्षेत्रातून बनसनगरीचे नाव रोशन करत आहेत. असे उद्गार पंचायत समितीचे माजी सदस्य कुमार उर्फ मेघराज कदम यांनी काढले. साहित्यिक डॉ.कदम यांची मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या सदस्य पदी निवड झाल्या बद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच अप्पासाहेब कदम तर प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील भाऊसाहेब कदम, प्रसिद्ध उद्योजक माणिकराव कदम, माजी मुख्याध्यापक सूर्यकांतराव कदम, मुख्याध्यापक माधवराव कदम, सामाजिक कार्यकर्ते बालासाहेब कदम, गजानन कदम, प्रवीण घाटगे यांची होती.पुढे बोलताना कुमार म्हणाले, विश्वकोश निर्मिती मंडळ वर जाऊन नरसिंग कदम यांनी आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटविलेला आहे.साहित्याच्या क्षेत्रातून त्यांनी बनवसनगरीचे नाव महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे काम केलेले आहे, करत आहेत. त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित झालेले आहेत, व अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पासाहेब म्हणाले नरसिंग कदम हे सतत साहित्य क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत याचा बनवस नगरीला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा सत्कार करून त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना डॉ.नरसिंग कदम म्हणाले, महाराष्ट्रभर नावलौकिक मिळालेला असला आणि अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले असले तरीही माझ्या आप्तेष्टानी, गावकऱ्यांनी केलेला सन्मान सर्व सन्मानापेक्षा आणि पुरस्कारापेक्षा खूप मोठा आहे. आपले प्रेम असेच असू द्यावे, नक्कीच मी साहित्यिक म्हणून व सामाजिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती करेल असेही याप्रसंगी म्हणाले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालासाहेब कदम यांनी तर आभार माधवराव कदम यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
