सर्व कार्यालयांनी सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर (एल.पी.उगीले) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यातील सर्व तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार असून त्यादृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी केलेल्या कामकाजाचा अहवाल तयार करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे म्हणाल्या.
शंभर दिवसीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित सर्व जिल्हा व तालुका स्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे विभागीय, जिल्हास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच तालुकास्तरीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
शंभर दिवसांच्या सात कलमी कृती कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयाचा सहभाग आवश्यक आहे. या उपक्रमात दुसऱ्या टप्प्यात सहभागी झालेल्या कार्यालयांनी ३० एप्रिलपर्यंत सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करून २ मे रोजी त्याबाबतचा अहवाल सादर करावा. कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण, कार्यालय व परिसराची स्वच्छता, क्षेत्रीय भेटी आदी बाबींवर विशेष लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.
प्रत्येक कार्यालयात दिशादर्शक फलक, नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी,सूचना पेटी,त्या कार्यालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे माहिती फलक या बाबी कार्यालयात असाव्यात. तसेच स्वच्छतेला प्राधान्य दिले जावे, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच पुढील आठवड्यापासून अचानक विविध कार्यालयांना भेटी देवून तेथील कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सात कलमी कृती कार्यक्रम अंतर्गत समाविष्ट बाबी आणि त्याअनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला.
